चंद्रपूर

चंद्रपूर: वरोरा तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार

अविनाश सुतार

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा: शेतात बैल चारत असताना वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार झाला. ही घटना आज (दि.३०) वरोरा तालुक्यातील बेंबळा शेतशिवारात घडली. सुर्यभान हजारे (वय ७०) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेने बेंबळा परिसरात भीतीमय वातावरण निर्माण झाले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, वरोरा तालुक्याच्या ठिकाणापासून ३० किलोमीटर अंतरावर बेंबळा आहे. खडसंगी वनपरिक्षेत्र अंतर्गत कक्ष क्रमांक ५९ लगत बफर झोनमधील बेंबळा शेतशिवारात शेतकरी सूर्यभान हजारे हा बैल चारण्यासाठी घेऊन गेला होता. बैल चरत असताना वाघाने थेट शेतकऱ्यावर हल्ला केला. यामध्ये तो जागीच ठार झाला. या घटनेची माहिती सर्वत्र पसरताच गावकऱ्यांनी घटनास्थळी गर्दी केली. या घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आल्यानंतर वनाधिकारी घटनास्थळी दाखल झाले.

चोवीस तासात चंद्रपूर जिल्ह्यात दोन घटना

दरम्यान, रविवारी चिमूर तालुक्यातील विहीरगाव शिवारात वाघाने हल्ला करून गुराख्याला ठार केल्याची घटना घडली होती. त्यानंतर आज पुन्हा वाघाने एकाचा बळी घेतला आहे. या घटनेमुळे बेंबळा शिवारात भीतीमय वातावरण निर्माण झाले आहे. वनविभगाने तातडीने वाघाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT