Chakmanakapur Metegaon Wild Animal Threat AI Photo
चंद्रपूर

Chandrapur Tiger Leopard Terror | चकमानकापूर-मेटेगावात वाघ-बिबट्याची दहशत; वनविभाग सुस्त

नागरिकांच्या जीवितासह पाळीव जनावरांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर

पुढारी वृत्तसेवा

Chakmanakapur Metegaon Wild Animal Threat

चंद्रपूर: जंगलाच्या कुशीत वसलेल्या सावली तालुक्यातील चकमानकापूर आणि मेटेगाव परिसरात वाघ व बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे नागरिक दहशतीच्या सावटाखाली जीवन जगत आहेत. मात्र, हिंस्त्र प्राण्यांचा वावर वाढूनही वनविभागाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. नागरिकांच्या जीवितासह पाळीव जनावरांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला असतानाही वनविभाग नेमका कोणत्या मोठ्या दुर्घटनेची वाट पाहत आहे, असा संतप्त सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.

चकमानकापूर येथे सुमारे ७० कुटुंबे, तर मेटेगाव येथे १५ कुटुंबे वास्तव्यास आहेत. दोन्ही गावांमध्ये अवघे दोन किलोमीटरचे अंतर असून, दोन्ही गावांची मिळून लोकसंख्या जवळपास 400 आहे. या नागरिकांच्या उदरनिर्वाहाचा मोठा आधार असलेल्या बैल, बकऱ्या आणि इतर पाळीव जनावरांची संख्या सुमारे ४०० आहे. दोन्ही गावे जंगल परिसरात असल्याने नागरिकांना दररोज आपल्या जीवाची पर्वा न करता जनावरे चारण्यासाठी जावे लागत आहे.

वनविभागाच्या निष्क्रियतेचा फटका पशुपालकांना बसत असून, अवघ्या आठ दिवसांपूर्वी चार वर्षांच्या गोऱ्यावर वाघाने हल्ला करून त्याला ठार केले. त्या पूर्वी अनेक जनावरे वाघ बिबट्यांनी भक्ष बनविले आहे. त्यामुळे घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जनावरे चारण्यासाठी जंगल परिसरात पाठवावीत की नाही, असा प्रश्न पशुपालकांसमोर निर्माण झाला आहे.

पाळीव जनावरांवर हल्ले करणारे वाघ व बिबटे आता मानवी वस्तीजवळ वावरत असल्याने भविष्यात एखाद्या नागरिकावर हल्ला झाल्यास त्याला जबाबदार कोण? असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. वनविभागाने केवळ एखादी घटना घडल्यानंतर पंचनामा करण्यापुरती भूमिका न घेता, घटना घडण्यापूर्वीच प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे गरजेचे आहे.

परिसरात नियमित वनगस्त वाढविणे, हिंस्त्र प्राण्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवणे, आवश्यक त्या ठिकाणी कॅमेरे बसविणे आणि ग्रामस्थांना सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. मात्र, या उपाययोजना प्रभावीपणे होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये वनविभागाविरोधात नाराजी वाढत आहे.

वनविभागाने तातडीने दखल घेऊन वाघ-बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात. अन्यथा एखाद्या नागरिकाच्या जीवावर बेतल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का? असा संतप्त सवाल चकमानकापूर व मेटेगाव येथील नागरिकांनी केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT