Brahmapuri 47 Degrees  Pudhari
चंद्रपूर

Brahmapuri Temperature | सलग पाचव्या दिवशी ब्रह्मपुरीचा पारा ४७ पार; देशातील सर्वाधिक उष्ण शहर

विदर्भात उष्णतेची तीव्र लाट कायम; अमरावती वगळता सर्व जिल्ह्यांच्या तापमानात वाढ

पुढारी वृत्तसेवा

Brahmapuri 47 Degrees

चंद्रपूर : विदर्भासह संपूर्ण मध्य भारतात उष्णतेचा कहर दिवसेंदिवस तीव्र होत असून चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी शहर सलग पाचव्या दिवशी ४७ अंशांच्या पुढे कायम आहे. भारतीय हवामान विभागाच्या ताज्या आकडेवारीनुसार, ब्रह्मपुरी येथे आज देशातील सर्वाधिक ४७.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. विशेष म्हणजे कालच्या तुलनेत तापमानात ०.४ अंशांची वाढ झाली असून सलग पाचव्या दिवशी तापमान वाढल्याने शहर अक्षरशः तप्त भट्टीसारखे तापले आहे.

विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये तापमान ४५ अंशांच्या पुढे कायम असल्याने नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दुपारच्या वेळेत रस्ते ओस पडत असून उष्ण वाऱ्यांमुळे घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. उष्माघाताचा धोका वाढल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.

हवामान खात्याच्या आजच्या नोंदीनुसार, अकोला येथे तब्बल २ अंशांनी तापमान वाढून ४५.४ अंश नोंदविण्यात आले. अमरावती येथे मात्र ०.२ अंशांनी घट होऊन तापमान ४५.० अंशांवर आले आहे. चंद्रपूर येथे ०.४ अंशांनी तापमान वाढून ४६.० अंश नोंद झाले, तर गडचिरोली येथे १.२ अंशांनी वाढ होत तापमान ४६.४ अंशांवर पोहोचले.

नागपूरमध्ये १.१ अंशांनी वाढ होऊन ४६.५ अंश तापमानाची नोंद करण्यात आली. भंडारा येथे थेट १.६ अंशांनी वाढ होऊन तापमान ४६.४ अंशांवर गेले, तर गोंदिया येथे १.१ अंशांनी वाढ होऊन ४६.१ अंश तापमान नोंदविण्यात आले. वर्धा येथे ०.५ अंशांनी वाढ होऊन तापमान ४६.० अंशांवर पोहोचले आहे.

यवतमाळ येथे १.२ अंशांनी वाढ होत तापमान ४४.४ अंशांवर आले, तर वाशिम येथे ०.१ अंशांनी वाढ होऊन ४३.५ अंश तापमान नोंदविण्यात आले. बुलढाणा येथेही तापमानात १.१ अंशांनी वाढ झाली असून तेथे ४१.१ अंश तापमानाची नोंद झाली आहे.

विशेष म्हणजे अमरावती वगळता विदर्भातील सर्व जिल्ह्यांच्या तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळे संपूर्ण विदर्भात उष्णतेची लाट अधिक तीव्र झाल्याचे चित्र दिसून येत आहे. दुपारच्या वेळेत बाजारपेठा आणि मुख्य रस्त्यांवर शुकशुकाट दिसत असून नागरिक अत्यावश्यक कामांशिवाय बाहेर पडणे टाळत आहेत.

दरम्यान, हवामान विभागाने नागरिकांना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. दुपारच्या वेळेत थेट उन्हात जाणे टाळावे, भरपूर पाणी प्यावे, डोक्यावर संरक्षण ठेवावे तसेच लहान मुले, वृद्ध आणि आजारी व्यक्तींची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. पुढील काही दिवस विदर्भातील उष्णतेची तीव्रता कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT