चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा: दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला करून एका गुराख्याला ठार केले. ही घटना आज (दि.२९) चिमूर तालुक्यातील पळसगाव वनपरिक्षेत्रातर्गत बेलारा येथे दुपारी दोनच्या सुमारास घडली. मधुकर जंगलू धाडसे (वय ४९ ) असे मृत गुराख्याचे नाव आहे. विहिरगाव शेतशिवरात सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे.
पळसगाव वनपरिक्षेत्रातील विहिरगाव बेलारा पळसगाव या वनपरिक्षेत्रात वाघाचा वावर वाढला आहे. विहीरगाव जंगलात वसले आहे. येथील शेतकऱ्यांकडे पशुधन मोठ्या प्रमाणात आहे. त्यावर ते संसाराचा उदरनिर्वाह करतात. गाव जंगलात असल्याने वन्य प्राण्यांची भिती नेहमीच असते. वाघाची दहशत असल्याने गुराख्यांनी जनावरे जंगलात चरायला नेणे बंद केले आहे. त्यामुळे घरची जनावरे स्वतःलाच पाळी पाळीने चरायला न्यावी लागत आहे. विहीरगावात सध्या प्रत्येक दिवशी सहा सहा शेतकऱ्यांची जनावरे चरायला नेण्यासाठी पाळी लावण्यात आली आहे.
आज प्रफुल पाटील, सुरेश ढोणे, सुधाकर नन्नावरे, सहादेव रदये, सुभाष बावणे , मधुकर धाडसे आदी पशुपालक तीनशे जनावरे घेऊन गेले होते. सकाळी १० च्या दरम्यान मन्सराम जीवतोडे यांच्या पडीत असलेल्या शेतात जनावरे चरत होती. यावेळी जनावरांना भक्ष्य बनविण्यासाठी वाघ परिसरात दबा धरून बसला होता. जनावरांच्या जवळ असलेला गुराखी मधुकर धाडसे याच्यावर दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला केला. त्यानंतर जनावरे ओरडण्यास लागली. त्यामुळे इतर गुरख्यांनी धाडसे यांना आवाज दिला. परंतु, त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे त्याचा शोध घेतला असता काही अंतरावर नाल्याजवळ वाघाने फरफटत नेल्याच्या खुणा आढळून आल्या. त्यापुढे शोध घेतला असता मृतदेह आढळून आला. शरीरावर ठीकठिकाणी वाघांच्या हल्ला केल्याच्या खुणा आढळून आल्या.
या घटनेची माहिती वन विभागाला दिल्यानंतर त्यांचा ताफा घटनस्थळी पोहोचला. पंचनामा करून मृतदेह चिमूर येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला.
हेही वाचा