चंद्रपूर : नागभीड तालुक्यातील घोडाझरी जंगल परिसरात मासेमारीसाठी गेलेल्या ६५ वर्षीय इसमाचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. चिंधिमाल गावाजवळील तलाव परिसरात चार दिवसांपासून बेपत्ता असलेल्या मोरेश्वर गोपिचंद सावसाकडे (वय ६५, रा. तुकुम, तिवर्ला) यांचा मृतदेह बुधवारी (दि. १९) आढळून आला. घटनास्थळी मासेमारीचे साहित्य तसेच वाघाच्या हल्ल्याची चिन्हे आढळल्याने त्यांचा मृत्यू वाघाच्या हल्ल्यात झाल्याचा प्राथमिक अंदाज वनविभागाने व्यक्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मोरेश्वर सावसाकडे हे १६ ऑगस्ट रोजी घोडाझरी जंगल परिसरातील चिंधिमाल तलाव येथे मासेमारीसाठी गेले होते. मात्र, रात्री उशिरापर्यंत ते घरी परतले नाहीत. त्यामुळे कुटुंबीयांनी त्यांचा शोध सुरू केला. १७ ऑगस्ट रोजी याबाबत वनविभाग आणि पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यानंतर वनविभाग व पोलिसांच्या पथकांकडून जंगल परिसरात शोधमोहीम राबविण्यात येत होती.
चार दिवसांच्या शोधमोहीमेदरम्यान चिंधिमाल गावाजवळील तलाव परिसरात त्यांचा मृतदेह आढळून आला. मृतदेहाजवळ मासेमारीचे साहित्य पडलेले होते. परिसरात मोठ्या प्रमाणात उंच गवत असल्याने जवळ आल्यानंतरच वन्यप्राण्याची चाहूल लागली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. घटनास्थळी वाघाच्या हल्ल्याची चिन्हे आढळून आल्याने वनविभागाकडून त्या अनुषंगाने तपास सुरू आहे.
जनकापूर परिसरातील अड्याळमेंढा, नवेगाव रिठ आणि चिंधिमाल या भागात गेल्या काही दिवसांपासून वाघाचा वावर असल्याचे वनविभागाच्या निदर्शनास आले आहे. यापूर्वी ४ ऑगस्ट रोजी जनकापूर येथील रमेश जैराम काशिवार यांच्यावर अड्याळमेंढा परिसरात वाघाने हल्ला केल्याची घटना घडली होती. या घटनेला पंधरा दिवसही उलटले नसताना चिंधिमाल परिसरात पुन्हा एका व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी वनविभागाने परिसरातील गस्त वाढविली आहे. ५ ऑगस्टपासून वन अधिकाऱ्यांसह सुमारे ३० वनमजूर जंगल परिसरात गस्त घालत आहेत. तसेच कॅमेऱ्यांच्या माध्यमातून वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात येत आहे. वाघाला जेरबंद करण्याच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजनाही वनविभागाकडून सुरू असल्याची माहिती आहे. दरम्यान, वनविभागाने नागरिकांना जंगलात तसेच वनक्षेत्रालगतच्या परिसरात एकट्याने न जाण्याचे आवाहन केले आहे.
चिंधिमालसह अड्याळमेंढा, नवेगाव रिठ आणि जनकापूर परिसरात वाघाचा वावर असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने वनविभागाने वाघाच्या हालचालींचा शोध घेऊन त्याचा तातडीने बंदोबस्त करावा, तसेच जंगल परिसरातील गस्त आणि कॅमेऱ्यांद्वारे निरीक्षण अधिक प्रभावी करावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.