Shankarpur Amboli road protest
चंद्रपूर : चिमूर तालुक्यातील शंकरपूर येथील शेतकरी ईश्वर भरडे (वय ४५) यांचा बुधवारी शेतात वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला. या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी प्रथम असोला बस स्टँड (भीसी–आंबोली रस्ता) येथे मृतदेह ठेवून ठिय्या आंदोलन केले.
त्यानंतर आंदोलन अधिक तीव्र करत मृतदेह शंकरपूरच्या भिसी कॉर्नरवर आणण्यात आला आणि रास्ता रोको करण्यात आला. तब्बल दहा तास मृतदेह रस्त्यावर ठेवून वाघाला गोळ्या घालण्याची मागणी करण्यात आली. "वाघाला ठार करण्यात येईपर्यंत मृतदेह हलवणार नाही, असा आक्रमक पवित्रा संतप्त ग्रामस्थांनी घेतला होता. अखेर वाघाला पकडणार, मृतकाचे कुटूंबियांतील एकास नोकरी देणार, व तारेचे कंपाउंड करण्याचे लेखी आश्वासन वन विभागाने दिल्यानंतर आज सकाळी सहाच्या सुमारास आंदोलन मागे घेण्यात आले.
चिमूर तालुक्यातील शंकरपूर-आंबोली मार्गावरील ठाणारीठ परिसरातील शेतात गेलेल्या ईश्वर भरडे या शेतकऱ्यावर त्याच्याच शेतात वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना बुधवारी (दि. ५) सकाळी घडली. मात्र, रात्र होऊनही सदर शेतकरी घरी परत न आल्याने नागरिक व कुटुंबियांनी शेतात जावून शोधाशोध केली असता त्याचा रात्री ८ च्या सुमारास मृतदेह आढळून आला. वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर रात्री संतप्त नागरिकांनी शंकरपूर-आंबोली मार्गावर 'रास्ता रोको' आंदोलन करून वनविभागाच्या विरोधात प्रचंड रोष व्यक्त केला.
बुधवारी रात्री 8 वाजता आंदोलनाला प्रारंभ झाला. रात्री उशिरापर्यंत चर्चा सुरू राहिल्या. वन अधिकाऱ्यांनी वारंवार विनंती केली तरीही ग्रामस्थ तोडगा निघेपर्यंत मृतदेह हलविण्यास तयार नव्हते. घटनास्थळी ब्रह्मपुरीचे उपवनसंरक्षक कुमारस्वामी, सहायक वनसंरक्षक महेश गायकवाड पोहोचले. त्यांनी ग्रामस्थ व आंदोलकांशी चर्चा केली परंतु तोडगा निघत नव्हता, अखेर दीर्घ चर्चेनंतर वन विभागाने नागरिकांना वाघाला तिन दिवसात पकडण्यात येईल, मृतकाच्या वारसाला नोकरी व जंगल परिसराला तारेचा कंपाऊंड घालण्यात येईल, असे लेखी हमीपत्र दिल्यानंतर आज गुरुवारी (दि.६) पहाटे ६.00 वाजता आंदोलन मागे घेण्यात आले.
त्यानंतर मृतदेहाचे शवविच्छेदनासाठी चिमूर येथे हलविण्यात आले. तब्बल दहा तास मृतदेहासोबत नागरिकांनी आपल्या मागण्यांकरीता रात्रभर आंदोलन केले. आंदोलना दरम्यान कोणताही अनुचित प्रसंग घडू नये म्हणून मोठा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता. घटनास्थळी सहायक पोलीस अधीक्षक ईश्वर कोटमाले, चिमूरचे विभागीय पोलीस अधिकारी दिनकर ठोसरे,भीसी पोलीस स्टेशनचे ठाणेदार महेश भोंगाडे,चिमूरचे ठाणेदार दिनेश लबडे यांच्यासह नागभिड व शेगाव पोलीस, कमांडो फोर्स व राखीव पोलीस दलाला तैनात करण्यात आले होते.
आठवडाभरात शंकरपूर परिसरात तिघांचा वाघाच्या हल्यात मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर वाघांचा बंदोबस्त करण्याची मागणी आणि आंदोलन करण्यात आले, परंतु, वनविभागाने वाघांचा बंदोबस्त केलेला नाही. त्यामुळे काल बुधवारी पुन्हा वाघाने तिसरा बळी घेतला. त्यामुळे या घटनेच्या विरोधता आज गुरूवारी शंकरपूर कडकडीत बंद पाळला. गावातील व्यापारी पेठ पूर्णपणे बंद ठेवण्यात आली. ग्रामस्थांच्या वतीने मोर्चाचे आयोजन करण्यात आले. मोर्चादरम्यान वाघाला गोळ्या घालण्याची मागणी करण्यात आली. भीसी कॉर्नर येथे मोर्चाचा समारोप करण्यात आला. जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष डॉ. सतीश वारजूकर यांनी मोर्चाचे नेतृत्व केले.यावेळी शुभम मंडपे, माजी उपसभापती रोशन ढोक तसेच परिसरातील शेकडो शेतकरी सहभागी झाले होते.
गेल्या काही दिवसांपासून परिसरात वाघाचा वावर वाढला असून शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये तीव्र भीतीचे वातावरण आहे. अनेक वेळा तक्रारी देऊनही ठोस उपाययोजना होत नसल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. या घटनेनंतर वन विभागावर दबाव वाढला असून दिलेल्या आश्वासनाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी होत आहे. धान कापणी व कापूस वेचणी सुरू आहे. अशातच वाघांची गडद छाया दोन्ही पिकांच्या हंगामावर पडली आहे. दोन्ही पिकांची कापणी आवश्यक असल्याने शेतकरी भिती असूनही शेताता कामावर जात आहे. अशातच वाघाचे हल्ले वाढले आहेत. त्यामुळे शेतकरी शेतमतूर महिला प्रचंड भितीमय वातावरणात शेतीचे कामे करीत आहेत.