पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी वरोरा तालुक्यात धान व कपाशी पिकांची प्रत्यक्ष पाहणी  
चंद्रपूर

Ashok Uike | संभाव्य दुष्काळ परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रभावी उपाययोजना करा!

पालकमंत्री डॉ. अशोक उईके, वरोरा तालुक्यात धान व कपाशी पिकांची प्रत्यक्ष पाहणी

पुढारी वृत्तसेवा

चंद्रपूर :  यावर्षी जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत जवळपास ४० टक्के पाऊस कमी झाला असून त्याचा परिणाम खरीप हंगामातील पिकांवर होण्याची शक्यता आहे. आगामी काळात अपेक्षित पाऊस झाला नाही किंवा परतीच्या पावसाने पाठ फिरविली तर शेतीसोबतच पिण्याच्या पाण्याची उपलब्धता आणि नागरिकांच्या दैनंदिन जीवनावरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे संभाव्य दुष्काळसदृश परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासनाने आतापासूनच प्रभावी आणि ठोस उपाययोजनांचे नियोजन करावे, असे निर्देश राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी दिले.

नियोजन सभागृहात आयोजित खरीप हंगाम आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार किशोर जोरगेवार, देवराव भोंगळे, करण देवतळे, सुधाकर अडबाले, जिल्हाधिकारी वसुमना पंत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह  उपस्थित होते.

पालकमंत्री डॉ. उईके म्हणाले, पावसातील तूट लक्षात घेता आगामी काळातील परिस्थितीचा अंदाज घेऊन प्रशासनाने पूर्वनियोजन करणे आवश्यक आहे. सर्व संबंधित यंत्रणांनी परस्पर समन्वयाने काम करावे. संभाव्य दुष्काळसदृश परिस्थितीत शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना कोणत्याही प्रकारची अडचण होणार नाही, यासाठी आवश्यक उपाययोजना निश्चित कराव्यात.

जिल्ह्यात पात्र शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वितरण वेळेत व्हावे. पीक नुकसानीच्या प्रकरणांमध्ये पंचनाम्यांची कार्यवाही तत्परतेने पूर्ण करून अहवाल तातडीने शासनाकडे सादर करावा. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याचे शासनाचे धोरण असून त्यासाठी आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्यात यावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

जिल्ह्यातील पाणीसाठा, उपलब्ध जलस्रोत, पिण्याच्या पाण्याची संभाव्य गरज, जनावरांसाठी पाण्याची व्यवस्था, खरीप पिकांची सद्यस्थिती, पीक कर्ज वितरण तसेच आवश्यक कृषी निविष्ठांची उपलब्धता याबाबत संबंधित विभागांनी नियमित आढावा घ्यावा. बैठकीत लोकप्रतिनिधींनी मांडलेल्या सूचनांची संबंधित यंत्रणांनी गांभीर्याने दखल घेऊन त्यानुसार कार्यवाही करावी, असेही पालकमंत्री डॉ. उईके यांनी निर्देश दिले.

वरोरा तालुक्यात धान व कपाशी पिकांची पाहणी

खरीप हंगाम आढावा बैठकीपूर्वी पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी वरोरा तालुक्यातील शेतांना प्रत्यक्ष भेट देऊन धान आणि कपाशी पिकांची पाहणी केली. कमी पावसामुळे पिकांवर झालेला परिणाम तसेच पिकांची सद्यस्थिती त्यांनी प्रत्यक्ष जाणून घेतली.

यावेळी पालकमंत्र्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून पावसाची स्थिती, पिकांची वाढ, सिंचनाची उपलब्धता तसेच शेतीसमोरील अडचणींबाबत माहिती घेतली. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडूनही पीक परिस्थितीचा आढावा घेतला. कमी पावसाच्या परिस्थितीत शेतकऱ्यांना आवश्यक तांत्रिक मार्गदर्शन देण्यासाठी कृषी यंत्रणेने थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचावे, अशा सूचना त्यांनी केल्या. यावेळी खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार करण देवतळे, जिल्हाधिकारी वसूमना पंत, मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह आदी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT