चंद्रपूर, पुढारी वृत्तसेवा : संपुर्ण जिल्ह्यामध्ये हवामान खात्याने 26 जुलैपर्यंत चार दिवस येलो अलर्टचा इशारा दिला आहे. या काळात जिल्ह्यात ठिकठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. हवामान खात्याने रविवारी आणि सोमवारी चंद्रपूर जिल्ह्यात रेड अलर्ट घोषित केला होता. दोन्ही दिवस चंद्रपूर जिल्ह्यात जोरदार मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे सर्वत्र पूर परिस्थिती निर्माण झाली आहे.
मागील दोन दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे ब्रह्मपुरी, नागभीड, शिंदेवाही, चिमूरमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे अनेक मुख्यमार्ग बंद पडले आहेत. याबरोबरच शेतामध्ये पुराचे पाणी साचल्याने रोवणी बंद पडल्या आहेत. सोमवारी रेड अलर्टमुळे जिल्ह्यातील शाळा महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली होती. मंगळवार (दि.22) पासून पुन्हा शाळा, महाविद्यालये पूर्ववत सुरू होणार आहेत.