चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : राज्यात अवकाळी पाऊस विसावल्याने शुक्रवारी (दि. ५) रात्री दिसलेले छायाकल्प चंद्रग्रहण देशातील आणि विशेषतः विदर्भातील खगोल प्रेमींना चांगल्या पद्धतीने पाहता आले. या खगोलीय घटनेबाबत नागरिक उत्साही दिसून आले.
भारतातुन दिसलेले हे या वर्षातील पहिलेच ग्रहण असल्याने बहुतेक लोकांनी या ग्रहणाचे निरीक्षण करून आनंद लुटला. या ग्रहनात चंद्र पृथ्वीच्या उपछायेतून (Penumbra) गेला असल्याने चंद्र किंचित अंधुक होताना दिसला. पृथ्वीची गडद छाया डावीकडे असल्याने चंद्राची डावी बाजू जास्त काळी जाणवत होती म्हणूनच त्याला छायाकल्प चंद्रग्रहण म्हणतात. अगदी असेच चित्र ५ मे रोजी रात्री आकाशात पहायला मिळाले.
जेव्हा चंद्र सूर्य आणि पृथ्वी एका रेषेत येतात तेव्हाच चंद्र-सूर्य ग्रहणे होतात. चंद्र ग्रहणवेळी सूर्य आणि चंद्राच्या मध्ये पृथ्वी येते आणि म्हणून पृथ्वीची सावली चंद्रावर पडते. पृथ्वीच्या दोन प्रकारच्या सावली असतात. गडद सावली आणि उपछाया, गडद सावलीतून चंद्र गेल्यास खग्रास तर उपछायेतून गेल्यास छायाकल्प चंद्रग्रहण घडते. हे छायाकल्प चंद्रग्रहण आशिया, आस्ट्रेलिया, युरोप, पूर्व आफ्रिका, पॅसिफिक, इंडीयन आणि अटलांटिक महासागरातून अनेकांनी पाहिले. भारतातून ग्रहणाला स्थानिक वेळेच्या फरकाने भारतीय वेळेनुसार ८:४४ वाजता सुरवात झाली. ग्रहणमध्य १०:५२ तर ग्रहण समाप्ती १:१ वाजता झाली. स्काय वॉच ग्रुपच्या आवाहनानंतर विदर्भातील लाखो नागरिक आणि विध्यार्थ्यांनी छायाकल्प चंद्रग्रहणाचे निरीक्षण केल्याची माहिती स्काय वॉच गृपचे अध्यक्ष प्रा. सुरेश चोपणे यांनी दिली.
हेही वाचा :