बुलढाणा : पंढरपूरला आषाढी एकादशीच्या वारीसाठी संत गजानन महाराज संस्थानच्या पायदळ पालखीचे आज रविवार २१जून रोजी सकाळी शेगाव येथून प्रस्थान झाले. यावेळी 'गण गणातून बोते' च्या गजरात भक्तिमय वातावरणाने शेगाव शहर दुमदुमून गेले.
पालखी समवेत ७०० पताकाधारी,टाळकरी -वारकरी सहभागी झाले आहेत. प्रस्थानापूर्वी मंदिराच्या प्रांगणात संस्थानच्या व्यवस्थापकीय विश्वस्तांच्या हस्ते श्रींच्या रजत मुखवट्याचे विधीवत पूजन करण्यात आले. पालखी सोहळ्याचे हे ५७ वे वर्ष आहे. बुलढाणा,अकोला, वाशिम, हिंगोली, परभणी, बीड, धाराशिव, सोलापूर व जालना या नऊ जिल्ह्यांतून २१ जून ते १९ ऑगस्ट असा ६०दिवसांचा व १२०६ कि.मी.चा पालखीचा प्रवास आहे.
श्रीक्षेत्र नागझरी अकोला, पातूर, श्रीक्षेत्र डव्हा, शिरपूर जैन, रिसोड, सेनगांव, श्रीक्षेत्र नरसी नामदेव, श्रीक्षेत्र औंढा नागनाथ, श्रीक्षेत्र त्रिधारा, परभणी, गंगाखेड, परळी वैजनाथ, अंबाजोगाई, कळंब, धाराशिव, श्रीक्षेत्र तुळजापूर, श्रीक्षेत्र मंगळवेढा या मार्गाने ३३दिवसांत ७०१कि.मी.पदक्रमण करून २३जुलै रोजी पालखी श्रीक्षेत्र पंढरपूर येथे आषाढी वारीसाठी पोहचेल.
२३ते २८जुलै असे सहा दिवस पंढरपूर येथे पालखीचा मुक्काम राहिल.विठ्ठल-रूक्मिणीचे दर्शन घेऊन गजानन महाराजांची पालखी २९ जुलैला शेगांवकडे परतीच्या प्रवासाला निघेल. कुर्डूवाडी, भगवान बार्शी, भूम, कुंथलगिरी, बीड, गेवराई,जालना, न्हावा, सिंदखेडराजा,लोणार,मेहकर,जानेफळ,खामगांव या मार्गाने २७दिवसात ५०१ कि.मी.परतीचा प्रवास करुन १९आगस्टला श्रींची पालखी शेगांवला मंदिरात पोहचेल.