बुलढाणा: राज्यातील १८ दुष्काळसदृश जिल्ह्यांची यादी शासनाने जाहीर केली व त्यामध्ये बुलढाणा जिल्ह्याचा समावेश नसल्याच्या बातम्या काही माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्या आहेत. मात्र, शासनाने अद्याप राज्यातील कोणताही जिल्हा दुष्काळग्रस्त म्हणून घोषित केलेला नाही.
त्यामुळे दुष्काळग्रस्त जिल्ह्यांच्या यादीबाबत प्रसिद्ध झालेल्या बातम्या वस्तुस्थितीला धरून नसून नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी केले आहे. यंदाच्या खरीप हंगामात पावसामध्ये पडलेला खंड, अनियमित पर्जन्यमान तसेच त्याचा पिकांच्या वाढीवर झालेला परिणाम याबाबत प्रशासनाने गांभीर्याने दखल घ्यावी, अशा सूचना पालकमंत्री मकरंद पाटील यांनी दिल्या आहेत. पावसामध्ये पडलेल्या खंडामुळे पिकांची वाढ खुंटणे, विविध रोगांचा प्रादुर्भाव होणे तसेच उत्पादनावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता लक्षत घेऊनच खरीप पिकांचे पंचनामे करण्यात येणार आहेत.
याबाबत 'एनडीआरएफ'च्या निकषांनुसार मुख्यमंत्री लवकरच याबाबत शासनस्तरावरुन पिकांचे नुकसानीचे सर्वेक्षण व पंचनामे करण्याच्या सूचना देतील. त्यामुळे सध्या दुष्काळग्रस्त किंवा दुष्काळसदृश जिल्ह्यांची अंतिम घोषणा झालेली नसताना याबाबत बातम्या अथवा अफवांवर शेतकऱ्यांनी विश्वास ठेवू नये.असे आवाहन पालकमंत्री मकरंद पाटील यांनी केले आहे.