बुलढाणा : जिल्ह्यातील ज्ञानगंगा वन्यजीव अभयारण्यातील वाघ पुनर्स्थापना प्रकल्पाची यशस्वी वाटचाल दिसत आहे. पेंच व्याघ्र प्रकल्पातून आणलेला व ७ महिन्यांपूर्वी या अभयारण्यात सोडलेला अडीच वर्ष वयाचा नर वाघ 'धुरंधर'(पीकेटी-७सीपी-१) हा ज्ञानगंगा अभयारण्यात स्थिरावल्याचे आणि नवीन अधिवासाशी पूर्णपणे जुळवून घेत आहे. वाघाच्या पुनर्स्थापन कार्यक्रमाच्या यशातले हे पहिले पाऊल समजले जात आहे.
अलिकडेच २७ जुलै रोजी या 'धुरंधर'नर वाघासाठी आवश्यक जोडीदार म्हणून आणलेली व पेंच व्याघ्र प्रकल्पातील 'काॅलरवाली'च्या तीन अपत्यांपैकी एक असलेली, दोन वर्षे वयाची 'मोना'(टी-१६३एसएएफ-१)ही वाघीणही नव्या अधिवासात अल्पावधीतच रुळत असून तीच्या अपेक्षित हालचालींमुळे वन विभागाचा उत्साह वाढला आहे.
'धुरंधर'ने गेल्या सात महिन्यांत ज्ञानगंगा अभयारण्याला आपला अधिवास म्हणून स्वीकारले आहे. तो नैसर्गिक भक्ष्यावरच अवलंबून असून नियमितपणे जंगलात भ्रमंती, शिकार आणि आपल्या क्षेत्राचे संरक्षण करत आहे. वाघाचे सर्व नैसर्गिक व्यवहार तो सातत्याने प्रदर्शित करत असल्याचे वनविभागाच्या निरीक्षणात दिसून आले आहे.
या वाघ पुनर्स्थापन प्रकल्पातील महत्त्वाची व अधोरेखित करण्यासारखी बाब म्हणजे या अभयारण्यात सोडल्यापासून आजमितीस 'धुरंधर'ने कुण्याही पाळीव जनावराची शिकार केली नाही. यातून ज्ञानगंगा अभयारण्यात उपलब्ध असलेले नैसर्गिक भक्ष्य आणि अधिवास हा वाघांसाठी अनुकूल असल्याचे प्रतित होत आहे. परिणामी मानव–वन्यजीव संघर्षाची शक्यताही कमी असल्याचे वन विभागाचे मत आहे.
'मोना' वाघीण ही नव्या वातावरणात सहजतेने वावरत आहे.ती जंगलातील विविध भाग, जलस्रोत आणि नैसर्गिक मार्गांचा नियमित वापर करत असून स्वतःचा अधिवास निश्चित करण्याच्या प्रक्रियेत आहे. तीच्या हालचालींवरून ती ज्ञानगंगा अभयारण्याशी यशस्वीपणे जुळवून घेत आहे. वन्यजीव विभागाच्या मते, 'धुरंधर'चे यशस्वी पुनर्वसन आणि 'मोना’चे जलद अनुकूलन ही ज्ञानगंगा अभयारण्यात स्थिर वाघसंख्या निर्माण करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे.
भविष्यात या नर-मादी वाघांचे आरोग्य व सुरक्षितता कायम राहिल्यास ज्ञानगंगा अभयारण्यात नैसर्गिक प्रजननालाही चालना मिळेल.त्याचबरोबर ज्ञानगंगा अभयारण्य हे वाघांच्या अधिवासासाठी ओळख निर्माण करेल. हे चित्र वन्यजीव संवर्धनाच्या दृष्टीने अभिमानास्पद असून व्याघ्रसंवर्धनाच्या प्रयत्नांना नवे दिशादर्शक ठरणार आहे. नियोजनबद्ध व वैज्ञानिक पध्दतीचे वनविभागाचे प्रयत्न आणि नैसर्गिक परिसंस्थेमुळे ज्ञानगंगा अभयारण्यात वाघांच्या डरकाळ्या वाढतील. हे वनवैभव पर्यटकांना नक्कीच भूरळ पाडेल.'धुरंधर'व 'मोना'ची जोडी ही ज्ञानगंगाचे मुख्य आकर्षण झाली आहे. येत्या वर्षात येथे त्यांच्या बछड्यांचीही भर पडू शकते. याविषयी वनप्रेमींना मोठी उत्सुकता आहे.