बुलढाणा, पुढारी वृत्तसेवा : लोणार तालुक्यातील हिरडव येथील स्टेट बँकेच्या शाखा व्यवस्थापकाची अज्ञात मारेक-यांनी चाकूने गळा चिरुन खून करून मृतदेह उसाच्या शेतात फेकून दिला. ही धक्कादायक घटना रविवारी (दि.१) सायंकाळी उघडकीस आली आहे. खून झालेले शाखा व्यवस्थापक उत्कर्ष पाटील (वय ३२) हे मुंबईचे रहिवासी आहेत. तीन आठवड्यापूर्वी त्यांची हिरडव शाखेवर तात्पुरती नियुक्ती झाली होती. ते या परिसरात नवखे असल्याने त्यांच्या खूनाचे गूढ वाढलेले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, २०१४ मध्ये एसबीआयच्या सेवेत रूजू झालेल्या उत्कर्ष पाटील यांची आठ वर्षांच्या सेवेनंतर परिविक्षाधीन शाखाधिकारी म्हणून बुलढाणा येथे कर्ज विभागात बदली झाली होती. त्यानंतर आपला परिवार मुंबईत असल्याचे कारण दाखवत त्यांनी सेवेचा राजीनामा सादर केला होता. त्यामुळे पाटील यांना राजीनामा मंजूर होईपर्यंतच्या अवधी दरम्यान जिल्ह्यातील जानेफळ, हिवरा आश्रम, हिरडव या शाखांवर तात्पुरती नियुक्ती देण्यात आली होती.
गत तीन आठवड्यापासून ते हिरडव (ता. लोणार )शाखेवर कार्यरत होते. रविवारच्या सायंकाळी लोणार-मेहकर मार्गावरील सारंग पूर फाट्यावरील उसाच्या शेतात पाटील यांचा मृतदेह आढळून आला. चाकूने त्यांचा गळा चिरून खून केल्याचे आढळले. त्यांच्या मृतदेहाजवळ चाकू ठेवून अज्ञात मारेकरी पसार झाल्याने खूनाचे गूढ वाढले आहे. मेहकर पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
हेही वाचा :