भंडारा, पुढारी वृत्तसेवा : दैतमांगली येथे शेतामध्ये रोवण करत असताना सर्पदंशाने एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि.20) घडली. शेतामध्ये सर्पदंश झाल्यावर त्या महिलेला तातडीने रुग्णालयात हालवण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला. गुणाबाई नत्थु मने (वय. 65 रा. सावरी मुरमाडी) असे मृत महिलेचे नाव आहे.
गुणाबाई मने शनिवारी अन्य महिलांसोबत रोवणी करण्यासाठी दैतमांगली येथे गेल्या होत्या. रोवणी करत असताना एका विषारी सापाने त्यांना दंश केला. यानंतर त्यांना तातडीने लाखनीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. त्यांच्यामागे एक मुलगा, दोन मुली असा परिवार आहे.जिल्ह्यात सततच्या पावसामुळे रोवणीला वेग आला आहे. परंतु, शेतात होत असलेल्या सर्पदंशाच्या घटनांमुळे महिला मजुरांमध्ये भीतीचे वातावरण आहे.