Nagpur tourist Ravanwadi reservoir drowning
भंडारा : जवळच्या रावणवाडी जलाशयावर रंगोत्सवाचा आनंद घेण्यासाठी नागपूरहून आलेल्या पर्यटकांची बोट उलटल्याने एकाचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (दि. ३) रोजी घडली. सौरभ मेहरा (३०, रा. नागपूर) असे मृत तरुणाचे नाव आहे.
होळी आणि रंगपंचमीनिमित्त जलाशय पर्यटकांसाठी बंद असतानाही, आदेशांचे उल्लंघन करून हे पर्यटक जलाशयात उतरले होते. नागपूर येथील १५ ते २० तरुणांचा गट सहलीसाठी रावणवाडी जलाशयावर आला होता. होळीनिमित्त सुरक्षा कारणास्तव बोटिंगवर बंदी असतानाही, या तरुणांनी बोटिंग करण्याचा हट्ट धरला. जलाशयात बोटिंग करत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने आणि बोट अनियंत्रित झाल्याने ती अचानक उलटली.
या दुर्घटनेत सौरभ मेहरा याला पोहता येत नसल्यामुळे तो पाण्यात बुडाला, तर त्याच्यासोबत असलेल्या इतर ५ तरुणांनी पोहत किनारा गाठल्याने त्यांचे प्राण वाचले. माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी तातडीने शोधमोहीम राबवून सौरभचा मृतदेह बाहेर काढला.
रावणवाडी वन हक्क समितीचे विजय राऊत यांनी दिलेल्या माहितीनुसार, होळीनिमित्त जलाशय पर्यटकांसाठी २ दिवस बंद ठेवण्याचे आदेश होते. मात्र, नागपूरवरून आलेल्या या तरुणांनी सर्व सूचनांना धाब्यावर बसवून बोटिंग करण्याचा प्रयत्न केला. यावेळी वन हक्क समितीचे सुरक्षा रक्षक आणि गावकरी यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता, या तरुणांनी त्यांच्याशी शाब्दिक बाचाबाची केली आणि सुरक्षा रक्षकांवर दगडफेक करण्याचाही प्रयत्न केला.
बोटिंग पूर्णपणे बंद असताना या तरुणांनी स्वत:च्या हाताने बोट जलाशयात ढकलली आणि त्याचवेळी गावकºयांशी त्यांचा वाद झाला होता. निसगार्चा आनंद घेताना सुरक्षेच्या नियमांचे पालन करणे किती आवश्यक आहे, हे या घटनेने पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे.