प्रातिनिधीक छायाचित्र File Photo
भंडारा

Bhandara Ethanol Project | नाना पटोलेंमुळे भंडारा तालुक्यातील इथेनॉल प्रकल्प पळाला

आमदार परिणय फुके यांचा घणाघात, प्रकल्पाची आशा मावळली

पुढारी वृत्तसेवा

भंडारा : भंडारा तालुक्यातील वैनगंगा नदीकाठावरील मकरधोकडा येथे प्रस्तावित असलेला इथेनॉल प्रकल्प २०१९ च्या सत्तांतरानंतर आमदार नाना पटोले यांनी होऊ दिला नाही. प्रदीर्घ काळाच्या प्रतिक्षेनंतर अखेर हा प्रकल्प ओरिसा राज्यात हलविण्यात आला, असा आरोप विधान परिषद सदस्य डॉ. परिणय फुके यांनी आज भंडारा येथे केला.

मकरधोकडा गावाची लोकसंख्या साधारणत: १८०० आहे. गावातील काही भाग गोसे प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात येत असल्याने त्या भागाचे पुनर्वसन करण्यात आले आहे. गावकऱ्यांची ७५ टक्के शेती गोसे प्रकल्पात गेली आहे. शेवटच्या टोकावर गाव असल्याने शेतीव्यतिरिक्त रोजगाराचा मागमूस नाही. गावात अनेक तरुण शिक्षित आणि कुशल आहेत. रोजगारासाठी ते भंडारा येथे मजुरीला जातात.

या गावशिवारात महसूल विभागाची सुमारे १४६ हेक्टर जागेचा एकच सलग पट्टा आहे. लागूनच बारमाही वाहणारी वैनगंगा नदी आहे. विपुल जागा आणि पाणी असे पोषक वातावरण असल्याने २०१९ मध्ये तत्कालिन पालकमंत्री व विधानपरिषद सदस्य डॉ. परिणय फुके यांच्या पुढाकाराने मकरधोकडा येथे तणसापासून इथेनॉल प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय तत्कालिन युती सरकारने घेतला होता. हा निर्णय होताच प्रकल्पासाठीच्या हालचालींनाही वेग आला. महसूल विभागाच्या १४६ हेक्टर जागेपैकी ४७ हेक्टर जागा प्रकल्पासाठी संपादीत करुन ती महाराष्ट्र शासनाच्या उद्योग आणि ऊर्जा विभागाच्या नावे हस्तांतरित करण्यात आली. या प्रकल्पामुळे भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील हजारो शेतकºयांना प्रत्यक्ष लाभ मिळणार होता तसेच बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होणार होता. प्रकल्प सुरू करण्याच्या सर्व औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर भूमिपूजन तेवढे शिल्लक होते. त्याचदरम्यान विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर आचारसंहितेमुळे भूमिपूजन रखडले.

दरम्यान, २०१९ मध्ये राज्यात घडलेल्या सत्तांतरानंतर महाविकास आघाडीची सत्ता आली. आ. नाना पटोले सत्तेत असताना राजकीय कुरघोडी करुन इथेनॉल प्रकल्प होऊ नये, यासाठी त्यांनी प्रयत्न केले. अखेरीस प्रकल्पाला उशीर होत असल्याने हा प्रकल्प ओरीसा राज्यात हलविण्यात आला, असे आ. फुके यांनी आज भंडारा येथे सांगितले.

इथेनॉल प्रकल्पामुळे भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील शेतकरी समृद्ध होऊ शकला असता. इथेनॉल प्रकल्पासाठी गावकरी प्रचंड उत्साहात होते. परंतु, प्रकल्प दुसऱ्या राज्यात गेल्याने सर्वांच्याच आशेवर पाणी फिरले गेले आहे.

असा होता प्रकल्प

तणसापासून इथेनॉल प्रकल्प निमीर्ती

घोषणा - सन २०१९

स्थळ:मकरधोकडा ता.भंडारा

भंडारा जिल्ह्यात ३.८४ लाख टन तर गोंदिया जिल्ह्यात ३.४६ लाख टन तणसाची उपलब्धता

सुमारे १५०० कोटी रुपयांची गुंतवणूक

शेतकर्‍यांना प्रतीकिलो तणस तीन रुपये दर मिळणार होता

१५ हजार तरुणांना रोजगार

४७ हेक्टर जागा संपादीत

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT