Tiger spotting Pevtha Bhandara
भंडारा: तालुक्यातील शहापूर वनपरिक्षेत्रात, विशेषत: पेवठा गावाच्या शिवारात वाघाने धुमाकूळ घातला आहे. मागील एका महिन्यात दोन पाळीव प्राण्यांची शिकार केल्याने पशुपालक आणि शेतकºयांमध्ये प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. संभाव्य मनुष्यहानी टाळण्यासाठी वन विभागाने मोठा फौजफाटा तैनात केला असून, वाघाला जेरबंद करण्यासाठी मोहीम सुरू असून वाघ हुलकावणी देत आहे.
शहापूर नियतक्षेत्रातील पेवठा गावाच्या परिसरात परसराम मेश्राम यांची गाय, तर सोमा वंजारी यांचा बैल वाघाने ठार केला. लागोपाठ झालेल्या या शिकारीमुळे परिसरातील नागरिक आणि शेतकºयांच्या काळजाचा ठोका चुकला आहे. या वाघाच्या पाऊलखुणा (पगमार्क) तब्बल १५ बाय १५ सेंटीमीटरच्या असून, त्याचे वजन २०० किलोपेक्षा जास्त असावे, असा अंदाज तज्ज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे.
सध्या रब्बी हंगामाची कापणी आणि भाजीपाला लागवडीची कामे सुरू आहेत. मात्र, वाघाच्या वावरामुळे शेतकरी कमालीचे धास्तावले आहेत. कापणीला आलेले चणा, तूर आणि कापूस पिके काढण्यासाठी मजूर शेतावर जाण्यास तयार नाहीत. याचा थेट आर्थिक फटका बळीराजाला बसत आहे. तसेच, जवाहरनगर आयुध निर्माणी कंपनीत रात्रीच्या पाळीला जाणाºया कर्मचाºयांनाही जीवावर उदार होऊन ये-जा करावी लागत आहे. परिसरातील गावांमध्ये भीतीचे वातावरण असल्याने अनेक शेतीची कामे सध्या ठप्प झाली आहेत.
वाघाचा बंदोबस्त करण्यासाठी जवाहरनगर पोलिस ठाण्याचे ठाणेदार भिमाजी पाटील आणि भंडारा वनपरिक्षेत्र अधिकारी व्ही. के. बेलखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. वनक्षेत्र सहाय्यक ए. डी. वासनिक, बीट रक्षक शिरीन शेख, जीवशास्त्रज्ञ शुभम मोदनकर, जलद बचाव पथकाचे शरद ताईतकर, अविनाश नागपुरे, शशांक तुरस्कर, अमोल नागरिकर, नरेंद्र उरकुडकर, उमेश वाढीवे आणि पोलीस पाटील चंद्रभान हटवार यांची टीम या भागावर रात्रंदिवस देखरेख ठेवत आहे.
वाघाचा मागोवा घेण्यासाठी वन विभागाने पिंजरे, ट्रॅप कॅमेरे आणि ड्रोन कॅमेºयांचा वापर सुरू केला आहे. वन विभागाचे पथक प्रत्यक्ष बांधावर जाऊन परिस्थितीचा आढावा घेत आहे. तसेच, शहापूर वनपरिक्षेत्रातील पेवठा आणि परिसरातील गावांमध्ये मुनादीद्वारे नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जोपर्यंत वाघ जेरबंद होत नाही, तोपर्यंत नागरिकांनी एकटे शेतात जाऊ नये, असे आवाहन वन विभागाकडून करण्यात आले आहे.