भंडारा: पुढारी वृत्तसेवा : राज्य शासनाचे शैक्षणिक धोरण व ग्रामीण भागातील शाळा बंद व्हाव्यात. या उद्देशाने काढलेल्या दोन शासन निर्णयाविरोधात शिक्षकांनी आज (दि. २५) शाळा बंद आंदोलन केले. या आंदोलनात हजारो शिक्षक सहभागी झाले होते. या आंदोलनामुळे जिल्ह्यातील काही शाळा बंद होत्या, तर काही शाळा सुरू होत्या.
संचमान्यतेच्या शासन निर्णयानुसार आधीच राज्यात कमी शिक्षक असताना सुद्धा त्यातूनही शिक्षकांची संख्या कमी करणे आणि वीस पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये फक्त एक शिक्षक कार्यरत ठेऊन कंत्राटी किंवा सेवानिवृत्त शिक्षकांची नेमणूक केली जाणार आहे. अशैक्षणिक कामाच्या कार्यात शिक्षकांना गुंतवून ठेवले आहे. यामुळे विशेषत: ग्रामीण भागातील शाळा बंद करण्याचा डाव शासनाने आखल्याचा आरोप शिक्षक संघटनांचा आहे.
उच्च शिक्षित बेरोजगारांना सेवेत घेण्यापेक्षा कंत्राटी पद्धतीने काम देण्याचा शासनाचा उद्देश तसेच सेवानिवृत्त शिक्षकांना सेवेत घेऊन तरुण बेरोजगारांना मात्र ताटकळत ठेवण्याचा मार्ग शासनाने स्वीकारला आहे. या विरोधात राज्यभर शिक्षकांमध्ये रोष निर्माण झाला. राज्यातील सर्व शिक्षक संघटनांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शासनाचा विरोध करण्यासाठी आज राज्यभर शाळा बंद आंदोलन केले.
यापूर्वी राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी मुंबई येथे मंत्रालयात राज्य शिक्षक समन्वय समितीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. बैठकीत शिक्षणमंत्र्यांनी सर्व मागण्या लवकरच मंजूर करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, आश्वासनाची पूर्तता न झाल्याने हे आंदोलन करण्यात आले.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष मुबारक सैय्यद, अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष बालकृष्ण भुते, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष श्रीधर काकिरवार, जुनी पेन्शन संघटनेचे अध्यक्ष फारुख शहा, महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष नरेश सातपुते, महाराष्ट्र राज्य पदवीधर महासंघाचे जिल्हाध्यक्ष युवराज वंजारी, शिक्षक भारती संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पटले, शिक्षक सहकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरविंद तिरपुडे, कास्टट्राईब कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शंभू घरडे, जिल्हा परिषद सेवानिवृत्त शिक्षक व इतर कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुधीर वाघमारे, पुरोगामी शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम झोडे यांच्यासह हजारो शिक्षक आंदोलनात सहभागी झाले होते.