भंडारा : जिल्ह्यातील अत्यंत महत्त्वाच्या बावनथडी सिंचन प्रकल्पात सध्या केवळ ३५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. पावसाचे प्रमाण घटल्याने खरीप हंगामातील धान पिकांना पाण्याची तीव्र गरज भासू लागली असून, धरणातील पाणी तातडीने कालव्यात सोडण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. याचबरोबर जीर्ण झालेल्या मुख्य कालव्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणीही लावून धरण्यात आली आहे.
जिल्ह्यात सध्या पावसाचा मोठा खंड पडला आहे. त्यामुळे सिंचनाअभावी शेतातील धान पिके सुकण्याच्या मार्गावर आहेत. बावनथडी प्रकल्पाच्या सिंचन क्षेत्रात तुमसर तालुक्यातील आंबागड, बघेडा यांसह ४८ गावांचा समावेश असून, सुमारे १३ हजार हेक्टर शेतीला या प्रकल्पाचा थेट लाभ मिळतो. मात्र, पिकांना अत्यंत गरज असतानाच्या काळातच पाणी मिळाले नाही, तर शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागण्याची भीती व्यक्त होत आहे.
सुकत असलेली पिके वाचवण्यासाठी धरणाचे पाणी कालव्यात सोडून जीर्ण कालव्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी लावून धरली आहे. दरम्यान, "बावनथडी सिंचन प्रकल्पात सध्या ३५ टक्के पाणीसाठा शिल्लक असून धान पिकांसाठी पाणी सोडण्याबाबत विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून योग्य तो निर्णय घेतला जाईल," अशी माहिती भंडारा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनाली माहुर्ले यांनी दिली.
बावनथडीचा मुख्य कालवा अनेक ठिकाणी जीर्ण झाला आहे. कालव्याच्या या दुरवस्थेचा मोठा फटका सिंचन व्यवस्थेला बसत असून, शेवटच्या टोकावरील (टेल-एंड) शेतांपर्यंत पुरेसे पाणी पोहोचत नसल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. कालव्याच्या दुरुस्तीकडे प्रशासनाचे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.