भंडारा : जुन्या वादाचा राग मनात ठेवून पुतण्याने त्याच्या काकाचा धारदार शस्त्राने वार करुन खून केला होता. याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयाने २३ जुलै २०२६ रोजी आरोपी पुतण्याला आजन्म कारावास व ४० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. अड्याळ पोलिस ठाण्यांतर्गत येणाºया ईटगाव येथे ३० जून २०२२ मध्ये ही घटना उघडकीस आली होती.
अनिकेश अजाबराव क्षिरसागर (४९) रा. चिखली ले आऊट, नागपूर असे मृतकाचे नाव असून संदेश राजेंद्र क्षिरसागर (२४) रा. नागपूर असे आरोपी पुतण्याचे नाव आहे. अनिकेश आणि संदेश यांच्यात पैशावरुन जुना वाद होता. या वादातून अनिकेश यांनी संदेशला मारहाण केली होती. याचा बदला घेण्यासाठी पुतण्या संदेश याने अनिकेश यांचा काटा काढण्याचे ठरविले. त्याने अनिकेश यांना ईटगाव-लेंडेझरी जंगल शिवारात नेले. तिथे जेवनासाठी बसले असता संदेश याने धारदार शस्त्राने अनिकेश यांच्या गळ्यावर वार करुन ठार केले.
ईटगाव येथील चंद्रशेखर चौधरी यांना अनिकेश यांचा मृतदेह जंगलात आढळून आल्यानंतर त्यांनी अड्याळ पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यांच्या तक्रारीवरुन अड्याळ पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदविला.
अड्याळ पोलिस ठाण्याचे तत्कालिन सहाय्यक पोलिस निरीक्षक सुधीर बोरकुटे यांनी या घटनेचा तपास करुन आरोपीविरुध्द सबळ पुरावे गोळा केले. सदर प्रकरणाचे दोषारोपपत्र जिल्हा सत्र न्यायालयात दाखल केले. जिल्हा सत्र न्यायाधीश भारती काळे यांनी पुराव्यांच्या आधारे आरोपी संदेश राजेंद्र क्षीरसागर याला आजन्म कारावास व ४० हजारांचा दंड, कलम ४०४ मध्ये ३ वर्षे शिक्षा व १० हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली.
न्यायालयात सरकार पक्षाकडून सरकारी अभियोक्ता रमाकांत खत्री यांनी बाजू मांडली. अड्याळचे ठाणेदार सचिन तायवाडे यांच्या नेतृत्वात पोलिस हवालदार सुरेश भगत यांनी कोर्ट पैरवी केली.