भंडारा

Bhandara-Balaghat Highway : भंडारा-बालाघाट राष्ट्रीय महामार्गाचा प्रस्ताव अडकला

backup backup

भंडारा; पुढारी वृत्तसेवा : भंडारा-तुमसर-बालाघाट या आंतरराज्य मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा दिल्याच्या घोषणा अनेकदा झाल्या असताना हा मार्ग अजूनही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरण झाला नाही. सध्या या रस्त्याची डागडूजी आणि देखरेख सार्वजनिक बांधकाम विभागाकडे (राष्ट्रीय महामार्ग) असून रस्त्यावर पडलेले जीवघेणे खड्डे सार्वजनिक बांधकाम विभागानेच भरण्याची गरज आहे. परंतु, सार्वजनिक बांधकाम विभागाचे याकडे अक्षम्य दुर्लक्ष असल्याने अनेकांना जीवघेण्या खड्ड्यातून प्रवास करावा लागत आहे.

भंडारा-तुमसर-बपेरा-बालाघाट हा आंतरराज्य महामार्ग असून या रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा केंद्रीय रस्ते महामार्ग मंत्र्यांनी दोन वर्षांपूर्वी घोषित केला होता. परंतु सदर रस्त्याच्या कामाला अजूनही सुरुवात झाली नाही. हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाने राष्ट्रीय महामार्ग म्हणून प्राधिकरणाकडे हस्तांतरणाचा प्रस्ताव दाखल केला आहे. परंतु सदर प्रस्ताव अजूनपर्यंत हस्तांतरण झालेला नाही. या रस्त्यावर जीवघेणे खड्डे पडले आहेत. त्यामुळे सदर खड्ड्यांची जबाबदारी स्थानिक सार्वजनिक बांधकाम प्रशासनाकडेच आहे. परंतु, संबंधीत सार्वजनिक बांधकाम विभाग केवळ खड्ड्यात मुरूम भरण्याचा सोपस्कार पार पडत आहे. हा संपूर्ण रस्ता डांबरीकरण करण्याची गरज आहे.

याबाबत तुमसर येथील शिवसेनेचे विभाग प्रमुख अमित मेश्राम यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण आणि भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडे तक्रार केली होती. सदर तक्रारीची दखल घेत भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे व्यवस्थापकीय संचालक व प्रकल्प संचालक डॉ. अरविंद काळे यांनी भंडारा येथील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता नरेश बोरकर यांना पत्रातून सदर रस्ता महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग झाला नसल्याची माहिती दिली असून सदर रस्त्याची जबाबदारी त्यांच्याच विभागाची असल्याचे नमूद केले आहे.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे सदर रस्ता अजून पर्यंत वर्ग न झाल्याने सदर राष्ट्रीय महामार्ग येथे प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात बराच उशीर आहे. त्यामुळे जिल्हास्तराला जोडणारा हा राज्य महामार्ग खड्डेमुक्त करण्याची जबाबदारी आता स्थानिक सार्वजनिक बांधकाम प्रशासनाकडे आहे. राज्य व केंद्रात प्रतिनिधित्व करणाºया लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष वेधून राज्य महामार्गाचे राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडे वर्ग करण्याकरिता प्रयत्न करण्याची गरज आहे.

SCROLL FOR NEXT