भंडारा जिल्ह्यातील पूर परिस्थिती निवळली असून प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू आहेत. Pudhari Photo
भंडारा

भंडारा: पुराचा १७० गावांना फटका, ४ हजार हेक्टर शेती बाधित

पुढारी वृत्तसेवा

भंडारा: पुढारी वृत्तसेवा : भंडारा जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून पुराने ठाण मांडले होते. अखेरीस पुरस्थिती निवळली आहे. या पुरामुळे जिल्ह्यातील एकूण १७० गावांना फटका बसला असून ४ हजार ३४१.५० हेक्टर शेती बाधित झाली आहे. पूर ओसरल्यानंतर साथीचे रोग पसरु नये, म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. (Bhandara Flood)

पूर ओसरला, वाहतूक सुरळीत सुरू

भंडारा जिल्ह्यात झालेला मुसळधार पाऊस आणि लगतच्या पुजारीटोला, संजय सरोवर, बावनथडी प्रकल्प, धापेवाडा आणि गोसेखुर्द प्रकल्पातून वैनगंगा नदीत मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केल्यामुळे वैनगंगा आणि चुलबंद नदीला पूर आला होता. तीन दिवस या पुराने थैमान घातले होते. भंडारा शहराच्या चौफेर पुराने वेढा घातला होता. अनेक घरे पाण्याखाली आली होती. पुरामुळे बाधीत झालेल्या कुटुंबांना बचाव पथकाच्या मदतीने सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. पुरामुळे अनेक रस्ते बंद झाले होते. आता पूर ओसरल्यानंतर या रस्त्यांवरील वाहतूक सुरळीत सुरू झाली आहे. (Bhandara Flood)

पुराचा ८ हजार ६८९ शेतकऱ्यांना फटका

पुरामुळे शेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. भंडारा तालुक्यातील ३५ गावातील १ हजार ६९६ हेक्टर, मोहाडी तालुक्यातील २७ गावातील ६८६ हेक्टर, तुमसर तालुक्यातील ६ गावातील १०० हेक्टर, पवनी तालुक्यातील १५ गावातील ५९५ हेक्टर, साकोली तालुक्यातील ३१ गावातील ४७० हेक्टर, लाखनी तालुक्यातील ४५ गावातील ४८६ हेक्टर आणि लाखांदूर तालुक्यातील ११ गावातील ३०८ हेक्टर शेतीमधील धान, सोयाबीन, भाजीपाला पिकांचे नुकसान झाले आहे. सदर नुकसान हे अंदाजित असून प्रत्यक्ष सर्व्हेक्षणानंतर नुकसानीत वाढ होण्याची शक्यता आहे. या पुरामुळे ८ हजार ६८९ शेतकऱ्यांना फटका बसला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT