अमरावती, पुढारी वृत्तसेवा: बकऱ्या चारण्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादात मुलाने वडिलांना मारहाण केली. या मारहाणीमध्ये गंभीर जखमी झालेल्या वडिलांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना दर्यापूर तालुक्यातील लांडी गावात बुधवारी (दि.२५) घडली. यामुळे गावात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणात आरोपी मुलगा मिलिंद गौरव इंगळे (वय ३०, रा.लांडी) याला अटक केली आहे. गौतम मारुती इंगळे (वय ६५) असे मृत वडिलांचे नाव आहे.
बकऱ्या चारण्यावरून मंगळवारी रात्री मिलिंद आणि त्याचे वडील गौतम यांच्यामध्ये वाद झाला. गौतम यांनी मिलिंद ला सकाळी उठून बकऱ्या चारण्यासाठी घेऊन जायला सांगितले होते. मात्र, मिलिंद वडिलांनाच जाण्यासाठी सांगत होता. यावरून दोघांमध्ये वाद झाला. हा वाद एवढा वाढला की, आरोपी मिलिंदने वडिलांना मारहाण केली. मारहाणीमुळे वडील गंभीर जखमी झाले. त्यांना उपकेंद्र चंद्रिकापूर येथे दाखल करण्यात आले होते. मात्र, प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती येथे दाखल करण्यात आले. जेथे उपचारादरम्यान बुधवारी त्यांचा मृत्यू झाला.
पोलिसांनी या प्रकरणात भावाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून आरोपी मुलाला अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध हत्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.