अमरावती

अंतरवाली सराटी येथील लाठीचार्ज गृहमंत्री फडणवीस यांच्या आदेशानेच झाला : अनिल देशमुख

backup backup

अमरावती, पुढारी वृत्तसेवा : अंतरवाली सराटी येथील मराठा आंदोलकांवर झालेला लाठी हल्ला हा गृहमंत्र्यांच्या आदेशानेच झाला असल्याचा दावा राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी अमरावतीत केला आहे. मी सुद्धा गृहमंत्री होतो. त्यामुळे आदेश दिल्यानंतरच लाठी हल्ला कसा होतो? याची मला पूर्ण कल्पना आहे, असे देशमुख म्हणाले.

अनिल देशमुख म्हणाले, माजी गृहमंत्री म्हणून मला याची माहिती आहे. मी अनेक अधिकाऱ्यांशी देखील मी चर्चा केली आहे. त्यामुळे मी खात्रीशीर सांगतो की अंतरवाली सराटी येथील लाठी हल्ला हा गृहमंत्र्यांच्या आदेशानेच झाला होता. एसपी अथवा तेथील कुठल्याही पोलीस अधिकारी आपल्या अधिकारात अशा प्रकारचा अमानुष लाठी हल्ला करूच शकत नाही,असेही देशमुख म्हणाले.

चौकशी समितीने तो हल्ला गृहमंत्र्यांच्या आदेशाने झाला नसल्याचा अहवाल दिला आहे. माहिती अधिकारातूनही गृहमंत्री फडणवीस यांनी तो आदेश दिला नसल्याचे उघड झाले आहे. याबाबत विचारले असता देशमुख यांनी सरकारही त्यांचे, अहवालही त्यांचा आणि गृहमंत्रीही त्यांचाच, त्यामुळे त्यातून सत्य कसे बाहेर येईल? असा सवाल उपस्थित केला. माहिती अधिकारातही खोटी माहिती सरकारने दिल्याचा दावा देशमुख यांनी केला आहे. राज्य सरकारने या प्रकरणी ज्या पोलीस अधिकाऱ्याला दोषी ठरवले त्याला आधी सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आणि नंतर त्यालाच सीआयडी मध्ये चांगली पोस्टिंग दिली. लोकांनी आवाज उठवल्यावर तीन दिवसात तो आदेश स्थगित करून पुन्हा अन्यत्र बदली केली. त्यामुळे हा राज्य सरकारचा बनवाबनवीचा खेळ आहे असा आरोप अनिल देशमुख यांनी केला.

दरम्यान अमरावती येथे 5 डिसेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने आक्रोश मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली. या मोर्चाला जयंत पाटील, रोहित पवार आणि पक्षाचे नेते उपस्थित राहणार आहेत असेही त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले सांगितले. तत्पूर्वी त्यांनी अमरावती जिल्ह्यातील अवकाळी पावसामुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीची देखील पाहणी केली तसेच राज्य सरकारने तात्काळ शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली.

हेही वाचलंत का?

SCROLL FOR NEXT