अमरावती : जिल्ह्यात तिवसा शहरातील आनंदवाडी शिवारात वनविभागाच्या जंगलात आग लागून सुमारे २५ हेक्टरवरील वनसंपदा गुरुवारी (दि.१३) जळून खाक झाली. नगर पंचायत अग्निशामक, वनविभाग यांच्यासह शहरातील स्थानिकांनी सुमारे २ तास प्रयत्नांची पराकाष्ठा केल्यानंतर आग आटोक्यात आली. तिवसा शहरातील सार्शी रोडवर आनंदवाडी गावाच्या बाजूला वनविभागाच्या क्षेत्रात अचानक ही आग लागली. ही बाब लक्षात येताच ग्रामस्थांनी नगर पंचायत अग्निशमक व वनविभाग यांना माहिती दिली. माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थांना सोबत घेऊन आग नियंत्रणात आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. तिवसा येथील वनपाल सोमेश्वर घोरमाडे व नगर पंचायत अग्निशमक कर्मचारी यांच्या मदतीने ही आग आटोक्यात आणण्यात आली. दरम्यान, आगीचे कारण समजू शकले नाही. मात्र, हा डोंगर शिवार निर्मनुष्य असून तिथे टवाळखोरांनी ही आग लावली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
आग लागल्यानंतर जंगल भाग असल्याने तेथे अग्निशामक गाडी येणे अशक्य होते. त्यामुळे आग विझविण्यासाठी ओल्या झाडाझुडपांच्या फांद्या हातात घेऊन तब्बल दोन तास शर्थीचे प्रयत्न करत वनविभागाने आगीवर नियंत्रण मिळविले.
या आगीची झळ साग शिसव, कडूनिंब, जंगली बाभळी आणि इतर सुमारे एक हजाराहून अधिक झाडांना बसली. त्यातील बहुतेक झाडे पाच वर्षांहून अधिक वयाची होती. मोठ्या झाडांना कमी झळ बसल्याने ती वाचण्याची शक्यता आहे. इतर झाडे मात्र आगीच्या भक्ष्यस्थानी पडून खाक झाली आहेत.