अमरावती : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने शनिवारी (दि.२) जाहीर केलेल्या बारावीच्या निकालात अमरावती विभागाने उत्तुंग कामगिरी केली आहे. अमरावती विभागाचा एकूण निकाल ९०.९२ टक्के लागला असून, राज्याच्या नऊ विभागीय मंडळांमध्ये विभागाने तिसरे स्थान पटकावले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत टक्केवारीत किंचित घट झाली असली, तरी क्रमवारीत पाचव्या स्थानावरून तिसर्या स्थानी झेप घेत विभागाने आपला दबदबा निर्माण केला आहे.
अमरावती विभागात जिल्ह्यानिहाय निकालात बुलढाणा जिल्ह्याने ९५.२२ टक्क्यांसह अव्वल स्थान कायम राखले आहे. त्यापाठोपाठ वाशीम (९१.१५ टक्के), अकोला (९०.१४ टक्के) आणि यवतमाळ (८९.६९टक्के) या जिल्ह्यांचा क्रमांक लागतो. अमरावती जिल्ह्याचा निकाल विभागात सर्वात कमी म्हणजे ८८.२६ टक्के लागला आहे.
शाखानिहाय निकाल, विज्ञान शाखेचा वरचष्मा
यंदाही विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली आहे. शाखानिहाय निकाल टक्केवारीत विज्ञान ९७.४८ टक्के, वाणिज्य ८९.८७ टक्के, कला ८१.३३ टक्के,व्यवसाय अभ्यासक्रम ७५.८७ टक्के आणि आयटीआय ९०.४०टक्के निकाल लागला आहे. निकालात मुलींनी पुन्हा एकदा मुलांना मागे टाकले आहे. अमरावती विभागातून ९३.९५ टक्के विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत, तर मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ८८.२९ टक्के इतके आहे. अमरावती विभागातल्या पाच जिल्ह्यातील १ लाख ४७ हजार ७५४ विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी १ लाख ३४ हजार ३५२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यामध्ये ६९ हजार ६७१ मुलांची तर ६४ हजार ६८१ मुलींची संख्या आहे. अनुक्रमे ८८.२९ व ९३.९५ अशी त्यांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी आहे.