अमरावती : शेतातील पिकांच्या नुकसानीचा पंचनामा करून मिळालेल्या विमा रकमेच्या बदल्यात ७ हजार रुपयांची लाच स्वीकारताना तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडल्याची घटना शनिवारी (दि.७) चांदूर रेल्वे तालुक्यात उघडकीस आली. या प्रकरणातील आरोपी रामेश्वर सोमेश्वर मलमकर (वय ४९) हे सज्जा कळमगाव, ता. चांदूर रेल्वे येथील तलाठी असून ते अमरावती येथील नक्षत्र रेसिडेन्सी फ्लॅट क्रमांक ३०८ येथे वास्तव्यास आहेत.
तक्रारदाराच्या वडिलांच्या नावावर शेती असून अतिवृष्टीमुळे संत्रा, सोयाबीन, तूर व हरभरा या पिकांचे मोठे नुकसान झाले होते. नुकसानभरपाईसाठी पीक विमा काढण्यात आला होता. त्यानुसार तलाठी मलमकर यांनी शेतातील नुकसानीचा पंचनामा केला. त्यानंतर तक्रारदाराच्या वडिलांच्या बँक खात्यात सुमारे ९७ हजार ५०० रुपये जमा झाले. मात्र पंचनामा केल्याच्या बदल्यात ‘कामाचे बक्षीस’ म्हणून तलाठी मलमकर यांनी तक्रारदाराकडे १० हजार रुपयांची मागणी केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले. या संदर्भात तक्रारदाराने ६ मार्च २०२६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीच्या पथकाने ७ मार्च २०२६ रोजी विरुळ स्टॉप (ता. चांदूर रेल्वे) येथे सापळा रचला. यावेळी आरोपी तलाठी मलमकर यांनी तक्रारदाराकडून ७ हजार रुपयांची लाच पंचासमक्ष स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्यांना रंगेहात ताब्यात घेतले. या प्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक बापू बांगर, अपर पोलीस अधीक्षक सचिन्द्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक सुनील किनगे यांच्या पर्यवेक्षणात पोलीस निरीक्षक सुजाता बन्सोड, अंमलदार प्रमोद रायपुरे, युवराज राठोड तसेच चालक पोउपनि सतीश कीटुकले यांनी केली. नागरिकांनी भ्रष्टाचाराविरोधात पुढे येऊन अशा प्रकारच्या तक्रारी एसीबीकडे नोंदवाव्यात, असे आवाहनही करण्यात आले आहे.