अमरावती, पुढारी वृत्तसेवा: लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. मात्र, प्रत्येकाला उत्तर द्यायला आम्ही बांधील नाही, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी (दि.२६) अमरावतीत दिली. संजय राऊत यांनी केलेल्या टीके संदर्भात विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना ते बोलत होते. उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते आमदार सुलभा खोडके यांच्या अमरावती मतदारसंघातील विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले. त्यानंतर पवार माध्यमांशी बोलत होते.
संजय राऊत यांनी मला शुभेच्छा दिल्या, त्याबद्दल धन्यवाद. सकाळी उठून कोणीतरी काहीतरी विचारणार आणि तुम्ही त्यावर मला विचारणार, मला त्यांचे काय घेणं देणं आहे? त्यांनी काय म्हणायचे हा त्यांचा अधिकार आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार असतो. मात्र, प्रत्येकाला उत्तर द्यायला आम्ही बांधील नाही, असे पवार म्हणाले.
लवकरच आचारसंहिता लागेल, नंतर भूमिपूजन व लोकार्पणाला मर्यादा येतात. निवडणुकीची, प्रचाराची धामधूम सुरू होईल. मात्र येणाऱ्या निवडणुकीत किती लोक उभे राहतात, कोणाला किती जागा मिळतील, याबाबत थोडीशी सहनशीलता दाखवा. आमचं महायुतीचं जेव्हा ठरेल. तेव्हा आम्ही पत्रकार परिषद घेऊ व एकत्रितपणे तुम्हाला सगळ्या जागांबाबत सांगू,असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.
पुण्यातील सभेबाबत आम्हाला पीएमओ ऑफिसचा फोन आला होता. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. आज दुपारी पुन्हा पाऊस येणार असल्याचा अंदाज होता. त्यामुळे लोकांना देखील त्रास होत होता. पुणेकरांची गैरसोय होईल व नागरिकांना त्रास होईल, त्यामुळे आम्ही पुण्यातील शाळांना सुट्टी सुद्धा दिली होती. आम्ही सगळी खबरदारी घेतली होती. मात्र, पीएमओ ला वातावरण बघून कार्यक्रम पुढे घेता येईल, असे वाटले.त्यामुळे पंतप्रधानांचा दौरा रद्द झाला नाही तर पुढे ढकलण्यात आला आहे, असे पवारांनी सांगितले.
अमरावतीच्या विद्यमान आमदार सुलभा खोडके या राष्ट्रवादीच्या तिकिटावर आगामी निवडणूक लढणार का, या प्रश्नावर उत्तर देताना अजित पवार म्हणाले की, आतापर्यंत 288 जागा पैकी कुठल्या जागा कुणाला मिळतात हे ठरलेले नाही. त्यामुळे ठरल्यानंतर मग आम्ही उमेदवार जाहीर करू. महायुतीतील जागावाटप ठरल्यावर पत्रकार परिषद घेऊन तुम्हाला सगळं सांगू असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते अमरावती शहरातील 200 घाटांच्या सुसज्ज जिल्हा स्त्री रुग्णालयाचे लोकार्पण आज करण्यात आले. अमरावती येथे 200 खाटांचे असलेले ब्रिटिशकालीन जिल्हा स्त्री रुग्णालय असून यालाच डफरीन रुग्णालय सुद्धा म्हटले जाते. हे रुग्णालय महिलांसाठी अपुरे पडत असल्याने व इमारत बरीच जुनी झाल्याने त्याच्याच बाजूला 66 कोटी रुपये खर्च करून अतिरिक्त 200 खाटांची सुसज्ज रुग्णालय इमारत तयार करण्यात आली आहे.