अकोला : बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या व परभणी जिल्ह्यातील सोमनाथ सूर्यवंशी यांचा कोठडीत मृत्यू झाल्याच्या निषेधार्थ आकोल्यात सोमवारी (दि.२०) दुपारी तीन वाजता जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा अशोक वाटिका येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी या दोन्ही प्रकरणातील आरोपींना फासावर लटकवा, अशा घोषणा मोर्चात सहभागी झालेल्या आंदोलकांनी दिल्या.
सरपंच संतोष देशमुख यांची हत्या व सोमनाथ सूर्यवंशी याचा पोलीस कोठडीत मृत्यू या दोन्ही घटनेचा निषेध व्यक्त करत दोन्ही प्रकरणातील आरोपींना अटक करावी व त्यांना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी करत आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर दणाणून सोडला. या मोर्चात संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख, मुलगी वैभवी आणि मुलगा विराज यांच्यासह विविध सामाजिक संस्था संघटनेचे तसेच राजकीय पक्षाचे पदाधिकारी अनेक मान्यवर सहभागी झाले होते.त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात शिष्टमंडळाच्या वतीने याप्रकरणी निवेदन देण्यात आले.