अकोला : ग्रामीण आवास योजनेद्वारे जिल्ह्यात २७ हजार ८२६ व्यक्तींच्या खात्यात पहिला हप्ता जमा करण्यात आला असून, घरकुलांच्या बांधकामाला चालना देण्यात आली आहे.
गरजू ग्रामस्थांना आपले हक्काचे घर मिळावे म्हणून ग्रामीण आवास योजनेची प्रभावी अंमलबजावणी होत आहे. केंद्रीय मंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, मंत्री योगेश कदम, प्रधान सचिव एकनाथ डवले यांच्या उपस्थितीत गत २२ फेब्रुवारीला राज्यातील १० लक्ष लाभार्थ्यांना घरकुलाचा पहिला हप्ता वितरित करण्यात आला.
पहिला हप्ता जमा झाल्यानंतर कामे एकाचवेळी सुरू व्हावीत या दृष्टीने लाभार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी जिल्हा परिषदेकडून मोहिम हाती घेण्यात आली आहे. त्यात सर्व विभागप्रमुखांकडून आज प्रक्षेत्र भेटी देऊन पाहणी व लाभार्थ्यांना प्रोत्साहन दिले जात आहे. हे काम पुढे जाण्यामुळे त्यानंतरची प्रक्रियाही जलद होईल व ग्रामस्थांचे स्वगृहाचे स्वप्न साकार होईल, असे जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी यांनी सांगितले.
अकोला तालुक्यात ५ हजार ७३४, अकोट तालुक्यात ३ हजार ८६४, बाळापूर तालुक्यात ४ हजार २६६ , बार्शीटाकळी तालुक्यात ३ हजार ५७२, मूर्तिजापूर तालुक्यात ३ हजार ३९०, पातूर तालुक्यात ४ हजार ३९०, तेल्हारा तालुक्यात २ हजार ६५० घरकुले निर्माण होत आहेत. पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर, जिल्हाधिकारी अजित कुंभार, मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी यांच्या मार्गदर्शनात मोहिम गतीने राबविण्यात येत आहे. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके, प्रकल्प संचालक मनोज जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिगंबर लोखंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी समाधान वाघ, हरिनारायण परिहार, सर्व गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी परिश्रम घेत आहेत.