भिवंडी : पुढारी वृत्तसेवा : भिवंडी शहरातील नारायण कंपाऊंड पद्मानगर या भागात काम करून दोघी महिला सायंकाळी घरी परतत असताना ओळखीच्या इसमाने येऊन महिलेस सोबत चालण्याचा आग्रह केला. मात्र त्या महिलेने नकार देताच संतप्त इसमाने महिलेवर चाकू हल्ला करीत तिला गंभीर जखमी केले आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कामावरून सुटलेली 30 वर्षीय महिला मैत्रीणसोबत घरी जात असताना नारायण कंपाऊंड गायत्रीनगर येथील यंत्रमाग कारखान्या शेजारील चिंचोळ्या गल्लीतून जात होत्या. मंजुदेवी गौतम हिच्या परिचयाचा राजेशकुमार राजकरण भारती, ऊर्फ राजू भारती (वय 32) हा पाठीमागून येऊन तिला आपल्यासोबत येण्यासाठी गळ घालू लागला.
महिला त्याचे सोबत पळून जात नसल्याचा राग मनात धरून त्याने आपल्या हातातील पिशवीतून चाकू काढून महिलेच्या पोटात डावे बाजूला भोसकून तसेच छातीवर डावे बाजूला वार करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.
या अचानक झालेल्या हल्ल्याने आरडाओरड झाला व तेथील कामगारांनी आरोपी राजेशकुमार भारती यास पकडून ठेवत शहर पोलीस ठाण्यास खबर दिली. पोलीस पथक तातडीने घटनास्थळी दाखल होत महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करीत आरोपीस ताब्यात घेत त्या विरोधात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला म्हणून गुन्हा दाखल करीत अटक केली असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत