ठाणे

फ्लेमिंगो अभयारण्याला रामसरचा दर्जा

सोनाली जाधव

मुंबई/ठाणे : पुढारी वृत्तसेवा
पर्यटकांचा आकर्षणाचा विषय ठरलेल्या ठाणे, नवी मुंबई परिसरात 5 हजार हेक्टर क्षेत्रावर असलेल्या ठाण्याच्या फ्लेमिंगो अभयारण्याला आता जागतिक रामसरचा दर्जा देण्यात आला आहे. याबरोबरच राज्यातील 23 नवीन राखीव संवर्ध क्षेत्र आणि 5 अभयारण्ये नव्याने घोषित करण्यात आली आहे. पर्यावरण स्नेही विकास या संकल्पनेतून ही नवीन क्षेत्रे घोषित करण्यात आली आहे.

राज्यात मागील अडीच वर्षात 1750 चौ.किमीवर 23 नवीन राखीव संवर्धन क्षेत्रे घोषित करण्यात आली आहे. यामध्ये कोकणातील आंबोली, दोडामार्ग, तिलारी, रायगड, रोहा याबरोबर पश्‍चिम महाराष्ट्रातील कोल्हापुरात जोर जांभळी, विशालगड, पन्हाळगड, मायनिंगपक्षी संवर्धन क्षेत्र, चंदनगड, गगनबावडा, आजरा गुजरगड, मसाई पठार या क्षेत्रांचा यात समावेश आहे तर नागपूरमधील मुनिया, मोगरकसा, अमरावतीतील महेंद्री, धुळ्यातील चिटबावरी, चिटबावरी, अलालदरी, नाशिक जिल्ह्यातील कळवण, मुरागड, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, रायगड जिल्ह्यातील रायगड, रोहा, पुणे जिल्ह्यातील भोर, सातारा जिल्ह्यातील दरे खुर्द यांचा समावेश आहे. यातील तिलारी, जोर जांभळी, आंबोली दोडामार्ग, विशाळगड, पन्हाळगड, मायणी, चंदगड, मुनिया आणि महेंद्री ही 9 संवर्धन राखीव क्षेत्रं अधिसूचित झाली आहेत.

ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्याचा या क्षेत्रात समावेश आहे. रामसर साईट ही रामसर कन्व्हेन्शन अंतर्गत नियुक्त केलेली पाणथळ जमीन आहे. ज्याला कन्व्हेन्शन ऑफ वेटलँड्स असेही म्हणतात. 17 चौरस किलोमीटर आरक्षित जंगल असताना, उर्वरित 48 चौरस किलोमीटर क्षेत्र गतवर्षी ऑक्टोबरमध्ये पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील क्षेत्र म्हणून अधिसूचित करण्यात आले होते. दरवर्षी सहा महिन्यांसाठी सुमारे 40,000 फ्लेमिंगोचे यजमान आहे ज्यात मोठ्या आणि कमी फ्लेमिंगोचा समावेश आहे.

ठाणे खाडी परिसर राज्यातील तिसरा रामसर
हिवाळ्यातील इतर स्थलांतरित पक्ष्यांसाठी देखील हे आश्रयस्थान आहे जसे की पायड अ‍ॅव्होसेट्स, ब्लॅक-टेलेड गॉडविट्स, कॉमन रेडशँक्स, स्टिन्ट्स आणि रेड प्लोव्हर्स. नाशिक जिल्ह्यातील नांदूरमधमेश्वर राखीव जंगलाला रामसरचा दर्जा मिळालेला महाराष्ट्रात पहिला क्रमांक होता.जानेवारी 2020 च्या आंतरराष्ट्रीय मँग्रोव्ह रामसर परिषदेत हा टॅग देण्यात आला. नोव्हेंबर 2020 मध्ये बुलडाणा जिल्ह्यातील लोणार हे रामसर ठिकाण म्हणून घोषित करण्यात आलेले दुसरे ठिकाण होते. आता ठाणे खाडी परिसर हा राज्यातील तिसरा रामसर परिसर ठरला आहे.

जैवविविधता वारसास्थळे
पुणे जिल्ह्यातील गणेशखिंड, धुळे जिल्ह्यातील लांडोरखोरी, कोल्हापूर जिल्ह्यातील बांबर्डे मायरेस्टिका आणि शिुस्टुरा हिरण्यकेशी ही चार जैवविविधता वारसास्थळे मागील अडीच वर्षाच्या काळात घोषित करण्यात आली असून या सर्वांची अधिसूचना निर्गमित झाली आहे.
रामसरचा दर्जा मिळाल्याने ते (फ्लेमिंगो अभयारण्य) पक्षी निरीक्षणासाठी देश-विदेशातील पर्यटकांना आकर्षित करेल. यामुळे स्थानिक लोकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करण्याबरोबरच पर्यावरण आणि पर्यटनाला चालना मिळण्यास मदत होईल. शिवाय, यामुळे दलदलीचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचेल आणि जागतिक पर्यटन नकाशावर येण्याबरोबरच त्याचे संरक्षण आणि संवर्धनाला गती मिळणार आहे.

'रामसर' स्थळे म्हणजे काय ?
ही स्थळे त्या देशाच्या दृष्टीने तसेच संपूर्ण जगासाठी महत्त्वाची स्थळे ठरतात. सध्या जगात 2200 पेक्षा जास्त स्थळांना रामसर स्थळे म्हणून मान्यता देण्यात आली आहे. विविध देश आपापल्या देशातील महत्त्वाच्या पाणथळ जागांचा समावेश या यादीत करत असतात.

पाच अभयारण्ये
शासनाने चंद्रपूर जिल्ह्यातील कन्हारगाव, विस्तारीत अंधारी वन्यजीव अभयारण्य, जळगाव जिल्ह्यातील मुक्ताई भवानी, गडचिरोली जिल्ह्यातील कोलामार्का, बुलडाणा जिल्ह्यातील विस्तारीत लोणार वन्यजीव अभयारण्य अशी पाच अभयारण्ये याच कालावधीत घोषित केली आहेत. यातील कन्हारगाव अभयारण्याची अधिसुचना निघाली असून उर्वरित अभयारण्याची अधिसूचना निर्गमित करण्याची कार्यवाही सुरु आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT