डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा : डोंबिवली जवळच्या भोपर गावातील एका घराला शनिवारी पहाटेच्या सुमारास आग लागून या घरातील एक महिला आणि तिच्या दोन मुली होरपळल्या होत्या. या दुर्घटनेतील महिलेचा खासगी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत अंत झाल्याचे वृत्त आहे. मात्र या अग्नीकांड प्रकरणाला 24 तासांनंतर नाट्यमय कलाटणी मिळाली आहे. बहिणीला आणि तिच्या मुलींना जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला, असा मृत महिलेच्या भावाने केला असून, पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. बहिणीने प्रेमसंबंधाला विरोध केला म्हणून पतीने कायमचा काटा काढल्याचा प्रकार या जळीतकांडातून उघडकीस आला असून या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे मानपाडा पोलिसांनी सांगितले.
घटनेच्या त्याच रात्री दाखल करण्यात आलेल्या तक्रारीत या महिलेचा पती प्रसाद पाटील याने आपली बहिण प्रीती (35) हिचा शारीरिक मानसिक छळ करुन तिच्या दोन मुली समीरा (14), समीक्षा (11) यांना कोणत्या तरी ज्वलनशील पदार्थाने जाळून त्यांना जिवंत ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा संशय व्यक्त केला आहे. पोलिसांनी गुन्हा नोंदवून या जाळीतकांडाचा सखोल तपास सुरू केला आहे. पेणजवळील वाशी सरेभाग येथील रहिवासी असलेल्या प्रीती हिचा 2007 सालात भोपर गावातील प्रसाद पाटील याच्याबरोबर विवाह झाला. या दाम्पत्याला समीरा आणि समीक्षा अशा दोन मुली आहेत. प्रसादचे अन्य एका महिलेशी प्रेमसंबंध असल्याचे प्रीतीला कळाले होते. तिने पती प्रसाद याला समजविण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीही तो ऐकण्याच्या मन… स्थितीत नव्हता. त्यानंतर तो प्रीतीला शारीरिक व मानसिक त्रास देऊ लागला. मुलींनाही नियमित मारझोड करू लागला, असे मृत प्रीतीचा भाऊ किशोर पाटील यांनी त्यांच्या तक्रारीत म्हटले आहे.
2015 मध्ये प्रसाद पाटील याच्या विरोधात प्रीती पाटील यांनी तक्रार केली होती. पुन्हा 2016 साला तक्रार दाखल करण्यात आली होती. आरोपी प्रसाद याचे बाहेर एका महिलेशी संबंध होते. यावरून प्रीती आणि आरोपी प्रसाद यांच्यात वाद होत असत. प्रसाद पाटील हा देखिल आगीत होरपळला. त्याच्या दोन्ही हातांना इजा पोहोचली आहे, तर समिरा आणि समिक्षा या दोघींची प्रकृती चिंताजनक आहे. या तिघांवर एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्यामुळे आरोपी प्रसाद पाटील याला अटक करण्यात आली नसल्याचे वपोनि शेखर बागडे यांनी सांगितले. तर डोंबिवली विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुराडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला. ते म्हणाले आरोपीविरोधात भादंवि कलम 307 नंतर 302 हे वाढीव कलम लावण्यात आले आहे.