नेवाळी; पुढारी वृत्तसेवा : किटकांपासून होणार्या लम्पी त्वचा रोगाचा ठाणे जिल्ह्यात शिरकाव झाला आहे. अंबरनाथ तालुक्यातील उसाटने गावात दोघा जनावरांचा मृत्यू झाला आहे. तर बदलापूर रमेश वाडी येथील दोन जनावरांचे नमुने भोपाळ येथे
प्रयोग शाळेत पाठवले असता त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहे. एकीकडे राज्यकर्ते हे राज्यभर दौरे करत आहेत.तर दुसरीकडे मात्र
बळीराजा मात्र या जनावरांच्या लम्पी आजारामुळे त्रस्त झाले आहेत.
लम्पी त्वचा हा गोवंश जनावरांना होणारा विषाणूजन्य त्वचारोग आहे. या आजाराला रोखण्यासाठी तातडीने लसीकरण करण्याची गरज
असते. मात्र सद्य परिस्थितीमध्ये पशुवैद्यकीय अधिकारी या घटनांकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याने सध्या शेतकरी हवालदिल झाले आहेत.
मलंगगड येथील उसाटने गावातील अक्षय मढवी आणि विश्वास मढवी यांच्या जनावरांचे मृत्यू झालेत. सध्या ग्रामीण भागात हा जलदगतीने
आजार पसरत आहेत. पशुवैद्यकीय अधिकार्यांकडून कोणत्याही प्रकारची अधिकृत सूचना शेतकर्यांपर्यंत पोहचवली नाही. त्यामुळे
जनावरांच्या सुरक्षेसाठी करायचं तरी काय, असा प्रश्न त्यांच्यासमोर पडलेला आहे. ग्रामीण भागात बहुतांश जनावर आजारी आहेत.मात्र
शेतकर्यांमध्ये जनजागृती न केल्याने आपल्या जनावराला काय झालं आहे, हे अनेकांना माहीतच नाही आहे.त्यामुळे या आधी काही जनावर दगावली असल्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे.मात्र पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी गावागावात पोहचणार कधी, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.