नेवाळी : पुढारी वृत्तसेवा अंबरनाथ तालुक्यातील मांगरूळ येथे मुख्य रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेने दुर्मिळ रानमांजर ठार झाले आहे. मांगरूळ गावच्या परिसरात मानवनिर्मित जंगल तयार झाले असल्याने मोठ्या प्रमाणात आता या परिसरात वन्य जीवांची वर्दळ वाढली आहे. त्यामुळे आता त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने योग्य अश्या उपाययोजना करणे आता अत्यंत आवश्यक झाले आहे.
अंबरनाथ तालुक्यातील मांगरूळ गावच्या डोंगरावर खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी वृक्षारोपण केले होते. यानंतर आता या परिसरात जंगल मोठ्या प्रमाणात निर्माण झाले असल्याने वन्य जीवांची वर्दळ परिसरात वाढली आहे. मलंगगड भागाला चहूबाजूने औद्योगिकीकरणाने वेढले आहे. त्यामुळे निसर्गाच्या सान्निध्यात वन्य जीव मोठ्या प्रमाणात आता मांगरूळ डोंगरावर येत आहेत. मात्र याच डोंगराच्या परिसरात प्राण्यांची वर्दळ होत असल्याने त्यांच्या ते जीवावर येत आहे.
येथील मुख्य रस्त्यावर रानमांजराला अज्ञात वाहनाची धडक लागून त्याचा मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच बदलापूर वनविभागाच्या अधिकार्यांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. मात्र अशा अपघातांच्या मालिकेमधून सुटकेसाठी त्यांच्यासाठी योग्य उपाययोजना करणे आवश्यक आहे