ठाणे: पुढारी वृत्तसेवा : मैत्रिणीला वारंवार ब्लॅकमेल करण्याऱ्या तरुणाचा तिच्या मित्राने खून केल्याची घटना कोपरी येथे उघडकीस आली आहे. तरुणीचा मित्र व ब्लॅकमेल करणाऱ्या तरुणामध्ये वाद झाल्याने तरुणाने कोयत्याने वार करून ब्लॅकमेल करणाऱ्या तरुणाची हत्या केल्याची खळबळजनक घटना ठाण्यातील कोपरी भागात घडली आहे. या प्रकरणी कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित तरुणास पोलिसांनी अटक केली असून त्याच्या मैत्रिणीला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. (Thane Crime News)
ठाणे पूर्वेकडील कोपरी परिसरातील चेंदनी कोळीवाडा येथे राहणारी 20 वर्षीय तरुणीची 28 एप्रिल 2024 मधे एका लग्न समारंभात स्वंयम सतीश परांजपे (रा. संचार सोसायटी, अष्टविनायक चौक, कोपरी, ठाणे) या तरुणासोबत ओळख झाली होती. त्यानंतर या तरुणाने तरुणीस कारमध्ये बसवून फिरायला जाऊ, असे सांगून गु॑गीचे औषध पाण्यामधून पाजुन स्वतःच्या घरी घेऊन गेला होता. त्यावेळी त्याने सदर तरुणीचे आक्षेपार्ह फोटो काढले होते. याच फोटोच्या आधारे तो तरूणीस वारंवार त्रास देत होता. तसेच तू मला भेटायला ये, असे मेसेज करून तिला कायम ब्लॅकमेल करत होता. (Thane Crime News)
याबाबत तरुणीने तिचा मित्र मयुरेश नंदकुमार धुमाळ (वय 24, रा. जांभळी नाका, ठाणे) यास सांगितली. त्यानंतर मयुरेश व तरुणी दोघेही शुक्रवारी सकाळी स्वंयम परांजपे यास तू तिचे काढलेले फोटो डिलीट कर, असे समजून सांगण्यास गेले. यावेळी तेथे स्वंयम परांजपे व मयुरेश धुमाळ यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. या भांडणात मयुरेश धुमाळ याने स्वंयम यास कोयत्याने डोक्यावर वार करुन त्याचा खून केला. घटनेची माहिती मिळताच कोपरी पोलिसांनी धाव घेऊन तरुण व त्याच्या मैत्रिणीला ताब्यात घेतले. या प्रकरणी कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.