डोंबिवली : तुमच्या घरात वापरून जुने झालेले कपडे आहेत का ? हे कपडे आम्हाला गरीब आणि गरजूंना द्यायचे आहेत, असे म्हणत एका चाळीस वर्षाच्या महिलेने डोंबिवली पूर्वेकडील नांदिवली परिसरात राहणाऱ्या एका महिलेच्या दारात उभे राहून कपडे देण्यासाठी तगादा लावला. घरात जुने कपडे नाहीत, असे सांगूनही महिला हटत नव्हती. दरम्यानच्या काळात महिलेने घरातील महिलेला भुरळ घालून, बोलण्यात गुंतवून तिच्या जवळील ३ लाख ६० हजार रूपयांचे दागिने लुटून नेले. या प्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
यातील तक्रारदार सायली अमरजीत सावंत (२७) या डोंबिवली जवळच्या नांदिवली गावातील गावदेवी मंदिर परिसरात कुटुंबीयांसह राहतात. सायली सावंत यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहितेप्रमाणे ४० वर्षीय अनोळखी महिलेविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
फसगत झालेल्या सायली सावंत यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, बुधवारी दुपारच्या सुमारास कार्यालयातून मी घरी आल्यानंतर अचानक एक अनोळखी महिला दरवाजात आली. आपण गरजू आणि गरीबांसाठी जुने कपडे घेतो, असे सायली यांना सांगितले. पण घरात जुने कपडे नाहीत. जेव्हा कधी असतील तेव्हा नक्की देईन, असे सायली यांनी दारात आलेल्या महिलेला सांगितले. काहीतरी करून घरातील जुने कपडे द्याच, असा आग्रह करून ही महिला दरवाजा समोरून जाण्यास तयार नव्हती. घरात जुने कपडे नाहीत, असे सायली त्या महिलेला सांगत होत्या.
दरम्यानच्या काळात या महिलेने सायली यांना भुरळ घालून संमोहित केले आणि बोलत असताना त्यांच्या गळ्यातील सोन्याचा ३ लाख ६० हजार रूपयांचा ऐवज काढून पलायन केले. थोड्या वेळाने भानावर आल्यावर सायली यांना त्यांच्या गळ्यातील सोन्याचा ऐवज गायब असल्याचे लक्षात आले. घरात आले तेव्हा सर्व दागिने अंगावर असताना अचानक दागिने गायब झाले कसे ? असा प्रश्न त्यांना पडला. दारात जुने कपडे घेण्यासाठी आलेल्या महिलेने भुरळ घालून आपल्या जवळील सोन्याचे दागिने फसवणूक करून नेल्याचा संशय व्यक्त करत सायली सावंत यांनी मानपाडा पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक एकनाथ पाऊलबुध्दे अधिक तपास करत आहेत.
गेल्या काही वर्षापासून डोंबिवलीत अनेक सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते स्वत:जवळ संस्थेचे ओळखपत्र ठेऊन घरोघरी जाऊन आदिवासी आणि दुर्गम भागात जाऊन गरजूंना कपडे वाटप करायचे असल्याचे सांगून रहिवाशांकडून कपडे जमा करून घेऊन जातात. चांगल्या ठिकाणी आपल्या घरातील कपडे जातात म्हणून अनेक रहिवासी घरातील सुस्थितीत असलेले पण वापरून जुने झालेले कपडे या कार्यकर्त्यांच्या स्वाधीन करतात. आता काही भुरट्या महिलांकडे कोणत्याही संस्थेचे ओळखपत्र नसते. स्वत:ची ओळख लपवून घरोघरी फिरून जुने कपडे मागण्याचा प्रयत्न करतात. या कालावधीत घरात कुणी आहे का ? याची चाचपणी करतात. चोरी किंवा फसवणूक करण्याच्या उद्देशाने त्यांचीही टेहळणी सुरू असते. असा फसवणुकीचा अनुभव असलेल्या काही रहिवाशांनी सांगितले.