ठाणे

पावसाळ्यातील रानभाज्या ! 'करटोली' भाजीने लावले खवय्यांना वेड

पुढारी वृत्तसेवा
माणगाव : कमलाकर होवाळ

पावसाळा सुरू झाल्यानंतर सर्वसामान्यांना रानभाज्यांचे वेड लागतात. गेल्या काही दिवसात कोकणात संतत धार पडणार्‍या पावसामुळे रानावनात तयार होणार्‍या रानभाज्या मोठ्या प्रमाणात बाजारामध्ये विक्रीसाठी येत आहेत. या रानभाज्या ग्राहकांचे पसंती असून मागणीसुद्धा चांगली आहे. पावसाच्या सुरुवातीलाच रानभाजी शेवळ तयार झाली असून नंतर रानावनातील झाडाझुडपात आढळणारे रानातील फळ भाजी म्हणजेच करटोली होय. दरवर्षीपेक्षा यंदाचे वर्षी मोठ्या प्रमाणात हि भाजी जंगलात मिळत असून ती मार्केटमध्ये हि विक्रीसाठी आली आहे.

तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात करटोलीची भाजी विक्रीसाठी बाजारपेठेतून येत असून यावर्षी एका किलोला 200/- रुपये एवढा भाव मिळत आहे. आयुर्वेदानुसार आरोग्यासाठी उत्तम असलेली करटोलीची भाजी सुरुवातीच्या पावसात मिळत असल्याने या भाजीची मागणी मोठ्या प्रमाणात आहे. खाण्यासाठी चविष्ट व रुचकर असलेली करटोलीची रानभाजी गृहिणींचीही मोठ्या प्रमाणात पसंती असते. तालुक्यातील आदिवासी महिलांना या रानभाज्या विक्रीतून चांगली कमाई होत असून गेल्या वर्षीच्या तुलनेत 10 ते 20 रुपये यावर्षी करटोलीची भाजी महाग झाली आहे. यावर्षी 200/- रुपये किलोने करटोलीची भाजी विकली जात आहे.

वर्षातून एकदा पावसाळ्यात हि भाजी मिळते. इतर भाज्यांपेक्षा हि भाजी स्वादिष्ट व रुचकर असते. करटोली भाजीचा भाव यावर्षी 200/- रुपये प्रति किलो. गेल्यावर्षी 175-180/- रुपये प्रती किलो होती.
कल्पना ठाकुर, गृहिणी

महामार्गावरील बाजारपेठांची गावे व रस्त्याच्या कडेला आणि ठिकाणी करटोली विक्रीसाठी स्थानिक महिला व विक्रेते विक्री करत असून पर्यटक प्रवासी आवर्जून ही भाजी खरेदी करताना दिसत आहेत. पुढील काही दिवसच ही भाजी उपलब्ध होणार असल्याने खवय्ये करटोलीची भाजी आवडीने विकत घेत आहेत. पावसाळ्याच्या सुरुवातीला करटोलीची वेल उगवते साधारणता महिनाभरात करटोलीला फळे येतात. ही फळं भाजी खाण्यासाठी अत्यंत रुचकर असल्याने ग्राहकांची चांगली मागणी आहे. यावर्षी 200/- रुपये प्रति किलोने करटोलीची विक्री केली जात आहे. झाडाझुडपात वाढत असणारी करटोलीची वनस्पती फळे मिळवणे कष्टाचे आहे. यातून चांगली आर्थिक कमाई होत असून रोजगार मिळत आहे.

पावसाळ्यातील रानभाज्या खाण्यासाठी अत्यंत चविष्ट व रुचकर असतात. करटोलीची भाजी तर आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी अशी आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीला काही दिवसच ही भाजी मिळत असल्याने आवर्जून आम्ही ही भाजी खरेदी करतो.
सोनी पवार, भाजी विक्रेता
SCROLL FOR NEXT