ठाणे : ठाणे महापालिकेला स्टेम प्राधिकरणाकडून होणारा पाणी पुरवठा शुक्रवार (दि.2) आणि शनिवार (दि.3) असा दोन दिवस बंद राहणार असल्याने ठाण्यात दोन दिवस उन्हा सोबतच पाणी टंचाईच्या झळा देखील सोसाव्या लागणार आहे. नियमित देखभाल दुरुस्ती आणि जलमापके बसवण्याचे काम हाती घेण्यात आल्याने हा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे . मात्र नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी एक वेळ टप्प्या टप्प्याने पाणी पुरवठा सुरु ठेवण्याचे नियोजन ठाणे महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. मात्र या दोन दिवसांमध्ये पाण्याचा वापर जपून करण्याचे आवाहन पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
शुक्रवार, दि. २ मे रोजी सकाळी ९:00 ते शनिवार, दि. ३ मे, रोजी सकाळी ९:00 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार आहे. या काळात, ठाणे महापालिकेच्या स्वत:च्या पाणी पुरवठा योजनेचे नियोजन करून पूर्ण २४ तास पाणी पुरवठा बंद न ठेवता टप्प्याटप्प्याने एक वेळ पाणी पुरवठा सुरू ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी, दि.2 मे रोजी सकाळी ९:00 ते रात्री ९:00 पर्यंत घोडबंदर रोड, पातलीपाडा, बाळकूम, ब्रम्हांड, पवार नगर, कोठारी कम्पाऊंड, डोंगरीपाडा, वाघबीळ या भागात पाणी पुरवठा बंद राहणार आहे. तर, शुक्रवारी, दि.2 मे राेजी रात्री ९:00 पासून ते शनिवारी, दि.3 मे रोजी सकाळी ९:00 वाजेपर्यंत समता नगर, ऋतू पार्क, सिद्धेश्वर, इंटरनिटी, जॉन्सन, जेल, साकेत, उथळसर, रेतीबंदर, कळवा आणि मुंब्रा येथील काही भाग येथे पाणी पुरवठा बंद राहणार असल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या वतीने देण्यात आली आहे.
शटडाऊनच्या काळात स्टेम प्राधिकरणाकडून योजनेमधील दैनंदिन देखभाल व दुरुस्तीची कामे आणि चेने येथे जलमापक बसविण्याचे काम करण्यात येणार आहे. पाणी पुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील १ ते २ दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. त्यामुळे कपातीच्या कालावधीत पाणी काटकसरीने वापरुन सहकार्य करण्याचे आवाहन ठाणे महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.