डोंबिवली : कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघातील 14 गावांसह 27 गावांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांना भेडसावणारा पाणी पुरवठ्याचा प्रश्न लवकरच सुटणार आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नवनियुक्त आमदार राजेश मोरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या शिष्टमंडळाने गुरूवारी (दि.12) एमआयडीसी विभागाचे सीईओ तथा सदस्य सचिव पी. वेलारासू यांची भेट घेतली.
या बैठकीला 27 आणि 14 अशा 41 गावांमधील पाणी पुरवठ्याच्या समस्येवर झालेल्या सखोल चर्चेनुसार सदरचा पाणी प्रश्न पुढील कालावधीत लवकरात लवकर कायमस्वरूपी सोडवण्यात येणार आहे. या चर्चेमुळे शिष्टमंडळाने आनंद व्यक्त केला. शिष्टमंडळात शिवसेना विधानसभा संघटक बंडू पाटील, ज्येष्ठ समाजसेवक दत्ता वझे, उपतालुकाप्रमुख गणेश जेपाल, उपतालुकाप्रमुख विकास देसले, विभागप्रमुख किसन जाधव, विभागप्रमुख अनिल म्हात्रे, हितेश गांधी आदींचा समावेश होता. आमदार राजेश मोरे यांनी पाणी प्रश्न सोडवण्यासाठी प्रथम प्राधान्य दिले आहे. या 27 आणि 14 अशा 41 गावांतील पाण्याचा प्रश्न लवकरच सुटणार असल्याचा विश्वास आमदार राजेश मोरे यांनी व्यक्त केला.