सुमित घरत
भिवंडी: हवामान विभागाने पुढील काही दिवस वर्तवलेल्या अवकाळी पावसाच्या इशाऱ्यानंतर राज्यात अनेक ठिकाणी गुरुवारी रात्री पावसाने हजेरी लावली. यामुळे येथील वीटभट्टी व्यवसायावर अवकळा पसरली आहे.
भिवंडी तालुक्यात मुख्यतः ग्रामीण भागात रात्री ढगांच्या गडगडाटासह विजांच्या कडकडाटानी तुरळक ठिकाणी पावसाच्या रिपरिपीने हजेरी लावली. एकीकडे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी दुसऱ्या ठिकाणी मात्र वीटभट्टी व्यावसायिक मालकांवर अवकाळी पावसाच्या काळे ढगांचे सावट निर्माण झाले असून व्यावसायिकांना आर्थिक फटका बसण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
तालुक्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात शेतीला पूरक जोडधंदा म्हणून वीटभट्टी व्यवसाय केला जात आहे. दरम्यान वीटभट्टी व्यवसायाचा आर्थिक फायद्याचे एप्रिल आणि मे हे दोन महिने शिल्लक असतानाच अचानकपणे गुरवारी रात्री पावसाने हजेरी लावली.
त्यामुळे विटांचा कच्चा माल पाण्यात भिजून व्यावसायिकांना नुकसानीला सामोरे जावे लागण्याची चिन्हे दिसू लागल्याने व्यावसायिकांनी कच्च्या मालाच्या तयार विटांच्या वीटभट्टीवर ताडपत्री टाकून वीटभट्टीला संरक्षण देण्याचा प्रयत्न केला आहे. भिवंडी तालुक्यातील ग्रामीणमध्ये अनेक ठिकाणी वीटभट्टी व्यवसायावर पावसाचा परिणाम दिसून येत आहे.
पावसाचा यलो अलर्ट
हवामान विभागाने अनेक जिल्ह्यांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर काही ठिकाणी उष्णतेच्या लाटांची शक्यता वर्तवली आहे. त्यानुषंगाने महाराष्ट्रासह मुंबई, ठाणे जिल्ह्याला उष्णतेच्या लाटांचा इशारा दिला असला तरी पावसाचाही अंदाज वर्तविण्यात आला आहे. यासाठी व्यावसायिकांनी विटांचा कच्चा माल पाण्यात भिजून नुकसान होऊ नये ताडपत्रीने कच्चा माल झाकण्यास सुरुवात केली आहे.
दहा हजारपेक्षा जास्त कुटुंबे अवलंबून
ऐन आर्थिक नफ्याच्या मुख्य महिन्यांत येथील वीटभट्टी व्यावसायिक नुकसानीच्या चिंतेत सापडल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे भिवंडी ग्रामीणमध्ये टेंभवली, जूनांदुर्खी, लाखिवली, पालिवली, धामणे, चिंबिपाडा, पाये, पायगाव, खारबाव, मालोडी, खार्डी, कोनगाव, पिंपळास, सुपेगाव, अंबाडी आदी गावांमध्ये सुमारे 250 पेक्षा जास्त वीटभट्ट्या असून या वीटभट्ट्यांवर सुमारे 10 हजारपेक्षा जास्त कुटुंबे अवलंबून आहेत.