उल्हासनगरः महापौर अश्विनी निकम यांच्या हस्तक्षेपानंतर उल्हासनगर उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन मागे घेण्यात आले. रुग्णाच्या मृत्यूनंतर संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयात तोडफोड केल्याने चिडलेल्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, उल्हासनगर कॅम्प दोन मधील भैय्यासाहेब आंबेडकर नगर मध्ये राहणारे भगवान निंभोरे यांना मंगळवारी मध्यरात्री उपचारासाठी उल्हासनगरच्या मध्यवर्ती शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या प्रकृतीची गंभीरता लक्षात घेता महापौर अश्विनी निकम यांनी स्वतः रुग्णालयात भेट देऊन डॉक्टरांना योग्य उपचार करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
मात्र उपचारादरम्यान भगवान निंभोरे यांचा मृत्यू झाला. यानंतर मृताच्या नातेवाईकांनी डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप करत रुग्णालयातील काचा व इतर साहित्याची तोडफोड केली. या घटनेमुळे रुग्णालय परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच मध्यवर्ती पोलीस ठाण्याने घटनास्थळी धाव घेतली असून आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
या घटनेच्या निषेधार्थ डॉक्टर, नर्सेस आणि इतर कर्मचाऱ्यांनी बुधवारी कामबंद आंदोलन पुकारले. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी सुरक्षा नसल्याची गंभीर तक्रार करत, स्थानिक राजकीय दबावामुळे गंभीर रुग्णांना दाखल करून घ्यावे लागते आणि त्यानंतर अश्या प्रकारच्या घटना घडतात, असा आरोप केला.
दरम्यान महापौर अश्विनी निकम, डॉ. मनोहर बनसोडे, शिवाजी रगडे तसेच मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांमध्ये बैठक झाली. तसेच वैद्यकीय आरोग्य समिती सभापती सविता तोरणे रगडे यांनीही रुग्णालय प्रशासनाशी चर्चा करत आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले.
महापौरांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना आरोपींवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या असून, रुग्णालयात सुरक्षा वाढवण्यासाठी शस्त्रधारी पोलीस तैनात करण्याचे आश्वासन देण्यात आले. त्यानंतर डॉक्टर व कर्मचारी पुन्हा कामावर रुजू झाले. महापौर अश्विनी निकम यांनी, डॉक्टरांची सुरक्षा ही प्रशासनाची जबाबदारी आहे. अशा प्रकारच्या तोडफोडीला कोणतेही समर्थन दिले जाणार नाही, असे स्पष्ट केले. तर आरोग्य सभापती सविता तोरणे रगडे यांनी, आम्ही पूर्णपणे रुग्णालय प्रशासनासोबत आहोत, अशी भूमिका मांडली.