उल्हासनगर : उल्हासनगर येथील कल्याणी कॉलनी भागात गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. भर रस्त्यात हा गोळीबार करण्यात आला असून या गोळीबारात दोघांचा मृत्यू आहे, तर यात काही जण जखमी आहेत. हा हल्ला बलवीर बिराजदार, शेखर बिराजदार, अजय राव, अजित शेख, देवेंद्र नाईक, सागर पाटील आणि त्यांच्या साथीदारांनी केल्याचा आरोप मयताच्या भावाने केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कॅम्प पाच मधील कैलास कॉलनी चौकात सायंकाळी साडेसातच्या सुमारास १५ ते १६ जणांच्या टोळक्याने हातात शस्त्रे घेऊन हा हल्ला केला. हा हल्ला बलवीर बिराजदार, शेखर बिराजदार, त्यांच्या साथीदारांनी केल्याचा आरोप मयताच्या भावाने केला आहे. घटनेची माहिती मिळताच हिललाइन पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. मयत आणि जखमींना उपचारासाठी मध्यवर्ती रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र जखमी अर्जुन चौहान याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, पंधरा दिवसांपूर्वी हप्ता न दिल्याच्या कारणावरून एका टेम्पो चालकावर हल्ला करण्यात आला होता. याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच टेम्पो पार्किंगच्या वादातून अनिल चौहान यांनी बलवीर बिराजदार आणि शेखर बिराजदार यांच्या विरोधात तक्रार दिली होती. या तक्रारीचा राग मनात धरून 28 एप्रिल रोजी आरोपींनी साथीदारांसह अनिल चौहान यांच्या घरी जाऊन लाकडी दांडक्याने मारहाण केल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर तडीपार असलेला कुख्यात गुंड सागर लक्ष्मण पाटील याने फिर्यादीचा मोठा भाऊ किशोर चौहान याला फोन करून धमकी दिली होती.