उल्हासनगर : उल्हासनगर कॅम्प ५ येथील कालीमाता मंदिर परिसरात दुकानासमोर चालू असलेला वाद सोडवला म्हणून सराईत गुंडाने सहकाऱ्यांच्या मदतीने दुकानदार आणि त्याच्या मुलावर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत वडील, त्यांचा अल्पवयीन मुलगा व त्यांच्या मित्राला गंभीर दुखापत झाली असून तिघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
बबलू आवला हे इडली-डोसा विक्रीचा कॉर्नर चालवतात. मंगळवारी रात्री सुमारे 11 वाजता वाजताच्या सुमारास दुकान बंद करत होते. गणेश पुजारी नामक तरुणाचा त्याच्याच सहकाऱ्याशी वाद चालू होता. हा वाद बबलू याने सोडवला. या गोष्टीचा राग मनात धरून पुजारी आणि त्याच्या 10 ते 12 सहकाऱ्यांनी लोखंडी कडे व धारदार शस्त्राचा वापर करून बबलू आवला, त्यांचा मुलगा आदित्य आवला व मित्र राहुल चव्हाण यांच्यावर हल्ला केला.
या हल्ल्यात तिघांनाही डोके व शरीरावर गंभीर जखमा झाल्या. रक्तस्राव सुरू झाल्यानंतर जखमींना तातडीने मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच हिललाईन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. या प्रकरणी आरोपी पुजारी व इतर दोन अनोळखी इसमांविरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे हिललाईन पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.