उल्हासनगर : उल्हासनगर शहरात महापालिकेच्या कंत्राटी सफाई कामगाराची ऑन ड्युटी हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या घटनेची माहिती मिळताच मृत कामगाराच्या पत्नीनेही आपले जीवन संपवल्याने उल्हासनगरात शोककळा पसरली आहे. मृत कामगाराचे नाव महादू जगताप(वय ३५) असे असून आत्महत्या केलेल्या पत्नीचे नाव पूर्वी महादू जगताप (३२) असे आहे. तर या प्रकरणातील संशयीत आरोपीचे नाव दुर्गेश गुप्ता (३१) असे असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महादू जगताप हे उल्हासनगर महापालिकेने कंत्राटी पद्धतीने दिलेल्या कोणार्क इन्व्हायको कंपनीत सफाई कामगार म्हणून काम करत होते. ही घटना उल्हासनगर कॅम्प क्रमांक ३ मधील सेक्शन २० परिसरातील बारेक क्रमांक 896 मध्ये घडली. महादू जगताप हे सकाळच्या सुमारास नेहमीप्रमाणे साफसफाईचे काम करत असताना संशयीत आरोपी दुर्गेश गुप्ता याने अचानक तीक्ष्ण हत्याराने त्यांच्यावर हल्ला केला. गंभीर जखमी झाल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, हल्लेखोर दुर्गेश गुप्ता हा नशेच्या अवस्थेत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. यापूर्वीही आरोपी आणि महादू जगताप यांच्यात वाद झाल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. दरम्यान, महादू जगताप यांच्या हत्येची माहिती मिळताच त्यांच्या पत्नी पूर्वी यांनी नैराश्यातून जीवन संपविल्याची धक्कादायक घटना घडली. या दुहेरी घटनेमुळे उल्हासनगर शहरात मोठी खळबळ उडाली. महादू जगताप यांच्या पहिल्या पत्नीचा यापूर्वीच मृत्यू झाला असून त्यांना दोन मुले आहेत.
घटनेची माहिती मिळताच मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर आवताडे, पोलीस निरीक्षक तुकाराम पादिर हे पोलीस पथकासह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. फॉरेन्सिक पथकही घटनास्थळी पोहोचून पंचनामा करत पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर आवताडे व पोलीस निरीक्षक तुकाराम पादिर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश काळे, पोलीस अंमलदार प्रशांत धुळे व किशोर काळे यांच्या पथकाने तात्काळ सूत्रे हलवत हल्लेखोर दुर्गेश गुप्ता याला अटक केली आहे.
उल्हासनगर शहरातील कचरा संकलनाचे काम कोणार्क कंपनीमार्फत करण्यात येते आणि या कामासाठी सुमारे ७०० कामगार कार्यरत आहेत. जोपर्यंत कामगारांच्या सुरक्षेची हमी उल्हासनगर महानगरपालिका तसेच कोणार्क कंपनी देत नाही, तोपर्यंत कामबंद आंदोलन सुरूच राहील, अशी घोषणा लढा कामगार संघटनेचे प्रमुख संदीप गायकवाड यांनी केली आहे. या आंदोलनाला राधाकृष्ण साठे, नवीन साठे, बंटी झावरे यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.