उल्हासनगर : उल्हासनगरच्या सुभाष टेकडी परिसरात पूर्ववैमनस्यातून सराईत गुंडावर तीन ते चार जणांनी जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना रात्री घडली. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या रोहित जगदाळे याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
रोहित जगदाळे हा रात्री सुभाष टेकडी परिसरात असताना तीन ते चार जणांनी त्याच्यावर हल्ला केला. हल्लेखोरांनी त्याला बेदम मारहाण करून चाकूने वार केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. गंभीर जखमी अवस्थेत रोहितला मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
पोलिसांना घटनेची माहिती मिळताच विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रहार गोडसे हे पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले. घटनेनंतर हल्लेखोर पसार झाले असून, विठ्ठलवाडी पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी तपास सुरू केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तसेच प्रत्यक्षदर्शींकडून माहिती घेऊन हल्लेखोरांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.
हा हल्ला नेमका कोणत्या कारणातून झाला, हल्ल्यात किती जण सहभागी होते आणि पूर्ववैमनस्याचे स्वरूप काय होते, याचा तपास पोलीस करत आहेत. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची पथके कार्यरत असून, तपासानंतर या हत्येप्रकरणी अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.