मुरबाड शहर : कल्याण-मुरबाड राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरणाच्या नावाखाली दशकानुदशकांची वयोमान असलेली हजारो वृक्षे कत्तल करण्यात आली. नियमांनुसार तोडलेल्या प्रत्येक वृक्षाच्या बदल्यात पर्यायी वृक्षलागवड व तिचे किमान काही वर्षे योग्य संगोपन करणे बंधनकारक असताना, प्रत्यक्ष हा कायदेशीर कागदी सोपस्कार ठरल्याचा गंभीर आरोप रिपाइं सेक्युलर पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष तथा निसर्गप्रेमी रविंद्र चंदने यांनी केला आहे.
काही ठिकाणी पर्यायी वृक्षलागवड झाल्याचा दिखावा केला परंतु, संगोपनाअभावी ती रोपे आज मृत अवस्थेत असल्याचे चंदने यांनी सांगितले. हे केवळ निष्काळजीपणा नव्हे, तर याकडे दुर्लक्ष होत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे. राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांमध्ये वृक्षतोड झाल्यास पर्यायी वृक्षलागवड, ते वृक्ष जिवंत राहणे, पाणीपुरवठा, कुंपण, निगा व नियमित ऑडिट या सर्व गोष्टी अनिवार्य आहेत. तरीही, नियमांची पायमल्ली होत असल्याचा आरोप चंदने यांनी केला.
‘रस्ता उभारणी आवश्यक आहे; पण निसर्गहत्येला विकास म्हणता येणार नाही,” असे चंदने यांनी सांगत, तोडलेल्या वृक्षांच्या बदल्यात जिवंत, टिकाऊ व वैज्ञानिक पद्धतीने वृक्षलागवड करून कल्याण-मुरबाड रस्त्यावरील वनसंपदेचे गतवैभव पुनर्स्थापित केले नाही, तर आंदोलन छेडणार.
या महामार्गावर हरवलेली हिरवळ म्हणजे केवळ झाडे नाहीत. पाणी, हवा, जैवविविधता व पुढील पिढ्यांचे भविष्य दावणीला लागले आहे. कागदोपत्री वृक्षलागवड दाखवून प्रत्यक्षात मृत रोपे; हा प्रकार थांबवण्यासाठी स्वतंत्र चौकशी, कारवाई हाच मार्ग आहे.