ठाणे : गेल्या दोन दिवसांपासून मुंबईसह ठाण्यात पावसाची दमदार हजेरी लावली असताना ठाण्यात मात्र काही भागात गुरुवारी 12 वाजल्यापासून ते शुक्रवारी 12 वाजेपर्यंत असा 24 तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे. एमआयडीसीच्या जलशुद्धी केंद्रात दुरुस्तीच्या कामामुळे हा 24 तसंच शटडाऊन घेण्यात आला असल्याने धो धो पावसातही घागर रिकामी अशी म्हणायची वेळ ठाणेकरांवर आली आहे.
मुंबईसह ठाणे शहरात गेल्या दोन दिवसांपासून दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे ठाणेकरांची पाण्याची चिंता मिटेल असा अंदाज व्यक्त होत असताना महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पाणी पुरवठा योजनेअंतर्गत जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रात अचानक देखभाल दुरूस्तीचे अत्यंत महत्वाचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे गुरुवारी दुपारी 12 वाजल्यापासून ते शुक्रवारी दुपारी 12 वाजेपर्यत ठाण्यातील काही भागात एकूण 24 तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
या शटडाऊन कालावधीत ठाणे महानगरपालिका अंतर्गत दिवा, मुंब्रा (प्रभाग क्र. 26 व 31चा काही भाग वगळता) आणि कळवा प्रभाग समितीमधील सर्व भागांमध्ये तसेच वागळे प्रभाग समितीमधील रुपादेवी पाडा, किसननगर नं. 2, नेहरुनगर, मानपाडा प्रभागसमिती अंतर्गत कोलशेत खालचा गाव येथील पाणीपुरवठा 24 तासांसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे.
पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होईल याची कृपया नागरिकांनी नोंद घ्यावी. तसेच पाणीकपातीच्या कालावधीत पाण्याचा वापर काटकसरीने करावा असे आवाहन ठाणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत करण्यात आले आहे.