डोंबिवली : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातर्फे जांभूळ येथील जलशुध्दीकरण केंद्रासह बारवी गुरूत्व वाहिनीच्या देखभाल व दुरूस्तीचे काम गुरूवारी 27 फेब्रुवारी रोजी रात्री 12 ते शुक्रवारी 28 फेब्रुवारी रोजी रात्री 12 वाजेपर्यंत हाती घेण्यात आलेले आहे. त्यामुळे शनिवारी (दि.1) कमी दाबाने पाणी वितरीत होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
या 24 तासांच्या कालावधीत देखभाल व दुरूस्तीच्या कामाकरिता जलशुध्दीकरण केंद्र आणि गुरूत्व वाहिनीतून कल्याण-डोंबिवली महानगरपालिका, उल्हासनगर शहर, डोंंबिवली औद्योगिक क्षेत्र, तळोजा औद्योगिक क्षेत्र आणि परिसरातील ग्रामपंचायतींना होणारा पाणी पुरवठा बंद राहणार असल्याचे एमआयडीसीच्या डोंबिवली विभागीय कार्यकारी अभियंत्यांनी कळविले आहे.
पाणी पुरवठा बंदच्या कालावधीत जांभूळ जलशुध्दीकरण केंद्र आणि बारवी गुरूत्व वाहिनीमार्फत परिसरातील शहरांना पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिन्यांंमधील पाणी बंद करण्यात येणार आहे. बारवी गुरूत्व वाहिनी आणि जांभूळ जलशुध्दीकरण केंद्रातून कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचा काही भाग, डोंबिवली औद्योगिक क्षेत्र, 27 गावांचा परिसर, तळोजा औद्योगिक क्षेत्राला दररोज पाणी पुरवठा केला जातो. गुरूवारी (दि.27) रात्री 12 ते शुक्रवारी (दि.28) रात्री 12 असा पाणी पुरवठा बंद राहणार असल्याने दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रहिवासी आणि औद्योगिक विभागातील उद्योजकांनी एक दिवस पुरले इतका पाणी साठा करून ठेवावा, असे आवाहन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातर्फे करण्यात आले आहे.