ब्रिटिश सरकारविरुद्ध सशस्त्र बंड पुकारणारे पहिले क्रांतिकारक म्हणून वासुदेव बळवंत फडके ओळखले जातात. 1857 च्या पहिल्या स्वातंत्र्यलढ्याच्या अपयशानंतर स्वातंत्र्याच्या युद्धाची पहिली ठिणगी वासुदेव बळवंत फडके यांनीच पेटवली होती. वासुदेवांना सशस्त्र क्रांतीचे जनक म्हटले जाते. क्रांतिवीर फडके यांच्या पुण्यपदस्पर्शाने पावन झालेली नेतीवलीच्या डोंगरावरील गुंफा इतिहास अभ्यासकांसह राष्ट्रप्रेमींना खुणावत आहे. रायगड जिल्ह्यातील शिरढोण गावी राहणार्या फडके कुटुंबात 4 नोव्हेंबर 1845 रोजी वासुदेव बळवंत यांचा जन्म झाला. विशेष म्हणजे 1879 सालात वयाच्या 34 व्या वर्षी क्रांतीचे स्फुल्लिंग चेतवणारे वासुदेव बळवंत फडके यांचे कल्याण-डोंबिवलीच्या वेशीवर असलेल्या नेतिवलीच्या भुईडोंगरीवरील स्मृतिस्थळ अद्यापही उपेक्षित राहिले आहे.
कल्याण-डोंबिवलीच्या जवळपास अगदी सीमेवर असलेल्या डोंगरावर बसून याच वासुदेव फडके यांना इंग्रजांविरुद्ध लढण्याचे बळ मिळाले ती गुंफा आजही अज्ञातवासात आहे. आद्य क्रांतिकारकांच्या स्मृतीला उजाळा मिळावा म्हणून तेथे साधी दिवा-पणतीही तिथे लावली जात नसल्याने स्थानिक पातळीवरील देशप्रेमींमध्ये नाराजीचे वातावरण आहे. वासुदेव बळवंत फडके यांनी त्यांच्या अज्ञातवासाच्या काळात नेतिवलीच्या भुईडोंगरवरील गुंफेत वास्तव्य केल्याचे जुने कल्याण-डोंबिवलीकर सांगतात. फडके यांचे आजोळ म्हणजे कल्याणचे बोरगांवकर. त्यामुळे कल्याणचा परिसर त्यांच्या पायाखालचा होता. भुईडोंगरीच्या गुंफेतून संपूर्ण कल्याण-भिवंडीचा टापू दिसतो. आज या गुंफेची अवस्था बिकट आहे. वाढत्या नागरीकणाचा फटका भुईडोंगरीलाही बसत आहे. हा डोंगर ढळत चालला आहे. अशा या भुईडोंगरीवरील गुंफेत आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांची प्रतिमा बसविण्यात आली आहे.
होमबाबा अर्थात नेतीवलीच्या भुईडोंगरीवर हिलकॉक गार्डनचे आरक्षण असून क्रांतिकारक वासुदेव फडके यांनी इंग्रजांच्या तावडीतून भूमिगत झाल्यानंतर या टेकडीचा आश्रय घेतला होता. तेथे असलेल्या एका गुंफेत त्यांचे काही काळ वास्तव्य होते. या टेकडीवरून एकीकडे मलंगगड, तर दुसरीकडे ठाणे ते कल्याणपर्यंत पसरलेल्या खाडीचा परिसर दिसतो. या गुहेतून ते आसपासच्या परिसराची टेहाळणीसह ध्यानधारणा करत असत.
डोंबिवलीतही वासुदेव बळवंत फडके यांचे वंशज राहतात. गोपाळनगरमध्ये राहणारे विजय कर्वे, पश्चिमेत राहणारे वामन फडके, गांधी नगरमध्ये राहणारे सॉफ्टवेअर तज्ज्ञ शरद फडके ही मंडळी वासुदेव बळवंत फडके यांची नववी पिढी आजही काही आठवणी आणि चित्रे जपून आहेत. थोर पुरुषाच्या स्मृतींचा दिवा तेवत ठेवण्याची जबाबदारी आपली असल्याचे मत टेकडीवर 1000 झाडे लावणार्या राजाराम मामांनी व्यक्त केले.
नेतीवलीच्या टेकडीवर असलेल्या आद्यक्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या गुहेच्या सुशोभीकरणासाठी 50 लाखांची तरतूद करण्यात आली होती. वासुदेव फडके यांच्या कार्याचा उचित गौरव करण्यासाठी त्यांच्या पुण्य पदस्पर्शाने पावन झालेली गुंफा आणि परिसराला ऐतिहासिक वास्तू म्हणून जतन करायला हवे. पुरातत्व खात्यासह केंद्र व राज्य सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्था अर्थात कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने पुढाकार घेतला पाहिजे, अशी इतिहासप्रेमींची मागणी आहे.
भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील सशस्त्र क्रांतीचे आद्य प्रवर्तक वासुदेव बळवंत फडके यांचा क्रांती कार्यकाळ 1845 ते 1883 पर्यंत होता. 1855 ते 60 या पाच वर्षांत त्यांचे माध्यमिक शिक्षण कल्याणमध्ये झाले. त्यामुळे त्यांचे वास्तव्य या काळात कल्याणमध्ये होते. अशा या क्रांतिवीर फडकेंचे वास्तव्य कल्याण-डोंबिवलीच्या वेशीवर असलेल्या नेतीवलीच्या टेकडीवर होते. 10 ते 15 एकर परिसरात पसरलेल्या या टेकडीच्या माथ्यावर क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांचे काही काळ वास्तव्य होते. या टेकडीच्या उत्तर दिशेला ही गुंफा आहे. या गुंफेत त्यांनी ध्यानधारणेसह टेहळणीसाठी अनेक दिवस मुक्काम केला. तत्कालीन नगरसेविका सुधाताई साठे यांनी क्रांतिवीर फडके यांचे बैठकस्थान पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्याचे ठरवले होते. मात्र सुधाताईंच्या निधनानंतर हा प्रकल्प अपूर्ण राहिला.